मुंबई – गेल्या तीन दिवसांमध्ये शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य गेल्या तीन दिवसात 2.22 लाख कोटी रुपयांनी वाढले.
आता शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य 2,22, 763 कोटी रुपयावर गेले असल्याचे दिसून येते. गेल्या तीन दिवसात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 786 अंकांनी वाढला आहे.
याबाबत बोलताना रेलिगेअर ब्रोकिंग कंपनीचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले की, आशावादी गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यामुळे गेल्या तीन दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहे.
माहिती तंत्रज्ञान आणि बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांची जोरदार खरेदी होत आहे. आगामी काळात माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटते. त्याचबरोबर भांडवलाचा उठाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे या दोन क्षेत्राकडे गुंतवणूकदार लक्ष देत आहेत.
आता शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित भांडवली मूल्य 2,33,86, 397 कोटी रुपये इतके झाले आहे. मात्र आता शेअर बाजाराचे निर्देशांक उच्चांकी पातळीवर आहेत. त्यामुळे आगामी काळात गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.