कोलकता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आठवडाभरानंतर दिल्लीचा दौरा करणार आहेत. त्यावेळी ममता काही विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटणार आहेत. त्यामुळे भाजपविरोधात एकवटण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या विरोधकांना मोठेच बळ मिळण्याची चिन्हे आहेत.
पुढील लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच भाजपविरोधी आघाडी स्थापण्याच्या हालचाली विरोधकांच्या गोटात सुरू झाल्याचे चित्र आहे. अशात ममतांच्या संभाव्य दिल्ली दौऱ्याचे महत्त्व वाढले आहे. त्या कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदींची भेट घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
काही दिवसांपूर्वी पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. त्यापाठोपाठ निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भेटीगाठींचे सत्र सुरू केले आहे. किशोर यांनी पवार, सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांची नुकतीच भेट घेतली. त्या भेटीगाठींचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, विरोधकांना एकत्र आणण्यास किशोरही सरसावल्याचे मानले जात आहे.
बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममतांच्या तृणमूल कॉंग्रेसने घवघवीत यश मिळवले. त्या यशात किशोर यांच्या रणनीतीचेही योगदान आहे. त्यांच्यापाठोपाठ ममताही भेटीगाठी घेणार असल्याने राजकीय तर्क-वितर्कांना आणखी खतपाणी मिळणार आहे.