– अमित डोंगरे
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम कसोटी लढतीत भारतीय फलंदाजांच्या मानगुटीवर स्विंग गोलंदाजीचे भूत बसल्याचेच सिद्ध होत आहे. त्यात तंत्रात दोष असल्याने आणि तरीही ऍक्रॉस खेळण्याचे तोटे काय असतात हे त्यांना आता चांगलेच लक्षात आले असेल.
भारताच्या पहिल्या डावाचे समीक्षण करायचे झाले तर रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी चांगल्या चेंडूवर अनावश्यकरीत्या फटके मारून आपल्या विकेट बहाल केल्या. त्यानंतर खेळपट्टीवर आल्यावर नांगर टाकण्याची क्षमता असलेला चेतेश्वर पुजारा ऍक्रॉस खेळण्याच्या प्रयत्नात पायचित बाद झाला. त्याचाच कित्ता कर्णधार विराट कोहलीने चांगला स्थिरावलेला असताना गिरवला. पाठोपाठ अजिंक्य रहाणेदेखील चांगल्या चेंडूला फटकावण्याच्या प्रयत्नात तंबूत परतला.
ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्धच्या मालिकांमध्ये चमकदार कामगिरी केलेले ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा हेदेखील आक्रमक फलंदाजी करण्याच्या नादात बाद झाले. त्यानंतरचे केवळ आयाराम गयाराम होते तेच कार्य त्यांनी पार पाडले. नाही म्हणायला कोहली व रहाणेच्या खेळीने भारतीय संघाची द्विशतकी नौका पार झाली व लाज राखली गेली.
इंग्लंडच नव्हे तर परदेशातील खेळपट्टी व वातावरणात चेंडू गुडलेंग्थवर कधीच येत नाही हे माहीत असताना स्विंगसमोर ऍक्रॉस फलंदाजी करण्याचा मोह आपल्याला इतक्या वर्षात का अवरता येत नाही याचे उत्तर कोणी देईल का, द वॉल राहुल द्रविडसारखा मोह आवरणे प्रत्येकाला शक्य नाही हे माहीत आहे, पण त्याचा वारसदार असलेल्या पुजारानेही कच खावी हीच शोकांतिका आहे.
प्रत्येक दशकात भारताला सचिन तेंडुलकर, द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण मिळणार नाहीत आहेत त्यातच भागवावे लागणार आहे. एक कोहली आणि काही प्रमाणात रोहित सोडला तर जागतिक दर्जा आजही उपलब्ध फलंदाजांकडे नाही हे त्रिवार सत्य आहे. आता सोकॉल्ड समीक्षक या वक्तव्यावर नाक मुरडतील पण जे सामन्यात दिसते तेच खरे असते. बाकी माध्यमांमध्ये किती कौतुक येते त्यावर दर्जा ठरत नाही.
साउदम्पटनची खेळपट्टी राक्षस नाही, पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आपले स्विंग गोलंदाजीचे भूत भारतीय फलंदाजांच्या मानगुटीवर बसेल याची पुरेपूर काळजी घेतली व चेंडूरूपी मेनकेच्या मोहापायी आपले फलंदाज विश्वामित्र बनले हेच खरे आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केली म्हणूनच ते आज अंतिम सामना खेळत आहेत, असेही काही जाणकार सांगतात.
मात्र, हीच भारतीय फलंदाजी टी-20 क्रिकेटच्या मुशीतून बाहेर यायचे नावच घेत नाही, मग कसोटी क्रिकेटवर अधिराज्य कसे गाजवणार हादेखील प्रश्न आहे. परदेशात विशेषतः इंग्लंडमध्ये खेळताना हवामान हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो, त्यामुळे प्रत्येक चेंडू डोळ्यांत तेल घालूनच खेळावा लागतो असे एकदा खुद्द द्रविडच म्हणाला होता.
या कसोटीतील भारतीय फलंदाजी पाहिल्यावर असे वाटते की, फलंदाजांनी झापड लावून फलंदाजी केली आहे. एखादा गोलंदाज किती षटके स्विंग मिळवेल, पण त्याच्याकडून खराब चेंडू पडेल याची वाट पाहण्यासाठी संयम हवा आणि नेमका तोच भारतीय फलंदाजांकडे दिसत नाही. चेतेश्वर पुजाराने पहिली धाव घेण्यासाठी 36 चेंडू घेतले.
द्रविडही असाच संथ खेळायचा पण त्याबरोबरच धावाही करायचा. उगीच नाही त्याच्या कसोटीत 13 हजारांपेक्षा जास्त धावा झाल्या आहेत. खेळलेले चेंडू म्हणजे धावा नव्हेत, त्या वेगळ्या काढाव्या लागतात हे आता पुजाराला कोणीतरी सांगण्याची वेळ आली आहे.