नवी दिल्ली – देशासाठी करोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट प्रचंड घातक ठरली. रुग्णालयां -सोबतच स्मशानभूमीबाहेरही रांगा लागल्याचे विदारक चित्र यावेळी पाहायला मिळाले. दुसरी लाट आता ओसरू लागल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येताना दिसतंय. त्यातच आणखी दिलासा देणारी बाब म्हणजे बाधित रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीबाहेर लागणाऱ्या रांगाही आता नाहीशा झाल्या आहेत.
पूर्व दिल्ली येथील कोव्हीड-१९ संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्यांसाठीच्या स्मशानभूमीमध्ये या शनिवारी व रविवारी एकाही मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले नाही. हे तब्बल दोन महिन्यांनंतर प्रथमच घडलं असल्याचं येथील कर्मचारी सांगतात.
राजधानी दिल्लीला यावर्षी एप्रिल महिन्यापासून करोना महासाथीने घट्ट विळखा घातला. अनेकांना विषाणूचा गंभीर संसर्ग झाल्याने आपले प्राण गमवावे लागले. मृतांची संख्या वाढल्याने स्मशानभूमींवर मोठ्या प्रमाणात ताण आल्याचं पाहायला मिळालं.
पूर्व दिल्ली महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात आतापर्यंत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांवर करण्यात आलेल्या अंत्यसंस्कारांचे प्रमाण हे गेल्या दोन महिन्यांपेक्षा कैक पटीने कमी आहे. शनिवारी (५ जून) व रविवारी (६ जून) तर एकही मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आला नाही. मात्र गेल्या दोन महिन्यांमध्ये स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांवर मोठा ताण होता.
याबाबत बोलताना पूर्व दिल्लीचे महापौर सत्येंद्र जैन सांगतात, “लोकांना मोठा दिलासा मिळालाय, मी यासाठी परमेश्वराचे आभार मानतो. स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करण्यात आलेल्यांची आकडेवारी दररोज माझ्याकडे येत असते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोव्हीड प्रोटोकॉलनुसार अंत्यविधी करण्यात आलेल्यांची संख्या जवळपास शून्य आहे.”
“आम्ही येथे दररोज २५ ते २७ करोना बाधित मृतांवर अंतिमसंस्कार करायचो. त्या मानाने आता परिस्थिती चांगली आहे. गेल्या दोन चार दिवसांमध्ये येथे एकाही करोना बाधित मृतदेहावर अंतिमसंस्कार झाले नाहीत.” पूर्व दिल्लीतील कारकडूम स्मशानभूमीत कर्मचारी असलेले वीरेंद्र सांगतात.
याच स्मशानभूमीमध्ये सीएनजी ऑपरेटरम्हणून काम करत असलेले रोहित यांनी, “आता परिस्थिती सामान्य आहे. मात्र पूर्वी स्मशानभूमीमध्ये पाय ठेवायला देखील जागा नसायची. ती परिस्थिती लोकांना परत कधीच पाहायला न मिळो अशीच प्रार्थना करतो.” अशी माहिती दिली.
पूर्व दिल्लीतील करोना मृत्यूबाबत बोलताना महापौर जैन यांनी, येथे बाधित रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी २०० जागा तयार केल्या होत्या. परिस्थिती इतकी वाईट होती की स्मशानभूमीचे पार्किंग देखील मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वापरावं लागलं. नातेवाईकांना तासन-तास वाट पहावी लागे.” अशा विदारक परिस्थितीची आठवण करून दिली.
सरकारी आकडेवारीनुसार, पूर्व दिल्लीत १ मे’ला सर्वाधिक १०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. एप्रिल महिन्याच्या अखेरच्या दोन आठवड्यांमध्ये व मे’च्या पहिल्या आठवड्यामध्ये पूर्व दिल्लीत दररोज ५० करोना बाधित रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते.
दरम्यान, राजधानी दिल्ली येथे सोमवारी गेल्या दोन महिन्यांतील सर्वात कमी बाधितांची नोंद करण्यात आली. सोमवारी येथे केवळ २३१ रुग्ण सापडले. विषाणू संसर्गाची लाट सर्वोच्च पातळीवर असताना दिल्लीत एका दिवसामध्ये सर्वाधिक २८३९५ रुग्ण नोंदवण्यात आले होते.