ठाणे – राज्य सरकारने अनलॉकसाठी 5 टप्प्यांचे नियोजन केले असून त्यानुसार राज्यातील जिल्हे आणि महानगरपालिका यांचे वर्गीकरण 5 गटांमध्ये करण्यात आले आहे. यानुसार राज्यातील जिल्ह्यांच्या वर्गीकरणामध्ये मुंबईप्रमाणेच ठाणे जिल्ह्याचा समावेश देखील तिसऱ्या गटामध्ये करण्यात आला आहे.
यानुसार, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिका हे स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून वगळता संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या गटात असेल.
राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाने करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन आपला जिल्हा किंवा महानगर पालिका कोणत्या गटामध्ये येणार, याविषयी आढावा घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सीनुसार ठाणे जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या गटात करण्यात आला आहे.
यासंदर्भात ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आदेश दिले आहेत. यानुसार ठाणे जिल्ह्यात तिसऱ्या गटासाठीचे निर्बंध आणि सूट लागू करण्यात येणार आहेत. याशिवाय, ठाणे महापालिका क्षेत्राचा समावेश दुसऱ्या गटात, कल्याण-डोंबिवली महापालिकेचा समावेश तिसऱ्या गटात, तर नवी मुंबई महापालिका क्षेत्राचा समावेस दुसऱ्या गटात करण्यात आला आहे. त्यामुळे या महापालिका क्षेत्रांना त्यानुसार निर्बंधांचे किंवा सूटचे नियम लागू होतील.