रायपुर – केंद्रातील भारतीत जनता पक्षाच्या सरकारने सतत लोकविरोधी धोरणे राबवून लोकांना हैराण केले आहे. त्यांनी नवीन शेतकरी विरोधी कृषी कायदे आणून त्यांच्या भवितव्याशीही खेळ चालवला आहे असा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला आहे.
छत्तीसगड सरकारने शेतकरी आणि पशुपालकांसाठी दोन नवीन अर्थ सहाय्य योजना सुरू केल्या असून त्यातील लाभार्थ्यांना आज राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमीत्ताने निधीचे वाटप करण्यात आले.
तो कार्यक्रम छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेण्यात आला. त्या कार्यक्रमाला सोनिया गांधी यांनी लिखीत संदेश पाठवला होता. तो तेथे वाचून दाखवण्यात आला.
त्या संदेशात त्यांनी वरील टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की केंद्रातील मोदी सरकार हे जनता व शेतकऱ्यांच्या विरोधात काम करीत असताना छत्तीसगडच्या सरकारने मात्र शेतकऱ्यांच्या हिताची चांगली काळजी घेतली आहे.
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्यातील सामान्य नागरीकांच्या चेहेऱ्यावर कायम हास्य व समाधान पसरवण्याचा प्रयत्न केला आहे असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
राजीव गांधी यांनी कायम सामान्य माणसांच्या हिताची काळजी वाहिली आहे, समाजातील उपेक्षित आणि कमकुवत घटकाच्या चेहेऱ्यावर हास्य पसरले पाहिजे असा ध्यास त्यांनी घेतला होता असेही सोनिया गांधी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.