नवी दिल्ली – केंद्र सरकारकडे ना कोणते धोरण आहे, ना कोणती उपाययोजना. असे असूनही बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलूच दिले जात नाही, असा आरोप प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतर ममता बॅनर्जींनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्लाबोल केला.
नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये महाराष्ट्रातील 17 जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश होता. मात्र, पश्चिम बंगालच्या एकाही जिल्हाधिकाऱ्यांनी हजेरी लावली नाही. स्वत: मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच हजर होत्या. यावेळी ममता बनर्जींनी पंतप्रधान मोदींवरच हल्ला चढवला.
Chief ministers reduced to puppets, not allowed to speak in COVID meeting with PM: Bengal CM Mamata Banerjee
— Press Trust of India (@PTI_News) May 20, 2021
ममता बॅनर्जी म्हणाल्या, या बैठकीला दहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून मी उपस्थित होते, त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहू दिले नाही. मात्र, भाजपचे मुख्यमंत्री सोडता इतर मुख्यमंत्र्यांना बोलूच दिले गेले नाही. भाजपचे काही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी आपापले मुद्दे मांडले. मात्र, आम्हाला बोलण्याची संधी मिळाली नाही. सर्व मुख्यमंत्री केवळ चुपचाप बसून होते. कोणीही काहीही बोलले नाही. आम्हाला व्हॅक्सीन अर्थात लसीची मागणी करायची होती, मात्र बोलूच दिले नाही.
करोना कमी होत असल्याचे मोदी म्हणाले. मात्र, आधीही असेच झाले होते. आम्ही तीन कोटी लसीची मागणी करणार होतो. या महिन्यात 24 लाख लसी मिळणार होत्या. मात्र, केवळ 13 लाख लसी मिळाल्या, असे त्या म्हणाल्या.