दक्षिणेकडील महत्त्वाचे राज्य असणाऱ्या तामिळनाडूमधील ज्येष्ठ नेते दिवंगत एम. के. करुणानिधी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र स्टॅलिन हे द्रमुक पक्षाचे, राज्याचे नेतृत्व करू शकतील का, याविषयी अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. परंतु 2019 ची लोकसभा निवडणूक आणि आताची विधानसभा निवडणूक यातून स्टॅलिन यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत आपल्यातील राजकीय मुत्सद्देगिरीचे दर्शन घडवले. आज स्टॅलिन हे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत. परंतु तामिळनाडूचे “दुसरे करुणानिधी’ म्हणून आपले स्थान निर्माण करण्यासाठी स्टॅलिन यांना बराच पल्ला गाठायचा आहे.
तामिळनाडू वगळता एका कॅबिनेटमध्ये आपण स्टॅलिन, नेहरू अणि गांधी यांचा कोठे शोध घेऊ शकतो? स्वातंत्र्यानंतर अनेकांनी आपल्या मुलाला देशातील महान नेत्यांची नावे दिली. परंतु तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री दिवंगत करुणानिधी यांनी मात्र आपल्या तिसऱ्या मुलाचे नाव स्टॅलिन ठेवले. त्यांचा जन्म रशियन नेते जोसेफ स्टॅलिन यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनीच झाला होता.
विशेष म्हणजे स्टॅलिन नावाने रशियन अधिकाऱ्यांत संभ्रम निर्माण झाला होता. याबाबतचा किस्सा खुद्द स्टॅलिन यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. 1989 च्या रशियन दौऱ्यात घडलेला हा प्रकार आहे. “नाम’ परिषदेच्या निमित्ताने एम. के. स्टॅलिन रशिया दौऱ्यावर गेले होते. जेव्हा ते मॉस्को विमानतळावर उतरले तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांचे नाव विचारले. तेव्हा त्यांनी आपले नाव स्टॅलिन असल्याचे सांगितले. नाव ऐकून विमानतळावरील अधिकारी स्टॅलिनकडे पाहू लागले. जेव्हा अधिकाऱ्यांनी स्टॅलिन यांच्या पासपोर्टची तपासणी केली तेव्हा त्यांनी अनेक प्रश्न विचारले. त्यानंतरच त्यांना पुढे जाता आले.
एम. के. स्टॅलिन यांनी नुकतीच तामिळनाडू मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. दक्षिणेतील “पॉलिटिकल टायकून’ पैकी एक असणाऱ्या एम. के. करुणानिधी यांनी आपले चिरंजीव स्टॅलिन यांना राजकीय धडे दिले आणि आता ते मुख्यमंत्र्याच्या वारशात सामील झाले. दक्षिणेतील द्रविड पक्षांची आपली स्वत:ची ओळख असते. जर द्रमुकवर अण्णादुराई आणि करुणानिधी यांचा प्रभाव होता तर अण्णाद्रमुकची शक्ती ही एम.जी.आर. आणि जयललिता यांच्या हातात होती.
करुणानिधींनंतर स्टॅलिन पक्षाचे, राज्याचे नेतृत्व करू शकतील की नाही, असे तामिळनाडूत बोलले जायचे. परंतु त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मग 2019 ची लोकसभा निवडणूक असो किंवा 2021 ची विधानसभा असो. फोर्ट सेंट जॉर्जवर शासन करण्यासाठी स्टॅलिन यांनी अनेक दशके वाट पाहिली. स्टॅलिनवर त्यांच्या वडिलांचा प्रभाव राहिला आहे.
करुणानिधी यांनी स्टॅलिनला अतिशय काळजीपूर्वक हाताळले आणि 2009 ते 2011 या कार्यकाळात त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवली. स्टॅलिन यांनी पक्षावर हळूहळू पकड बसवली. अर्थात तोपर्यंत करुणानिधी जिवंत होते. 2021 च्या निवडणुकीत त्यांचे नशिब पालटले. कठोर परिश्रमाच्या बळावर त्यांनी मुख्यमंत्रिपद मिळवले. स्टॅलिन हे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले असले तरी त्यांच्यापुढे आव्हानांची जंत्रीच आहे. त्यांनी 500 लोकप्रिय घोषणा केल्या आहेत. ही आश्वासने पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.
या आश्वासनात घरी असलेल्या महिलांना एक हजार रुपये मानधन देण्याचा समावेश आहे. याशिवाय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज संपवणे आणि विधवांना दीड हजार रुपये पेन्शन देणे याचाही उल्लेख करावा लागेल. पन्नाशी ओलांडलेल्या एकाकी राहणाऱ्या महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. मात्र द्रमुक सरकारला तामिळनाडूचे वास्तव जाणून घ्यावे लागेल. अशा घोषणांची पूर्तता करण्यासाठी पैसा गोळा करणे आव्हानात्मक आहे.
दुसरे आव्हान म्हणजे स्टॅलिननी करोनाच्या काळात पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. अर्थात माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी हे करोनाचा सामना करण्यासाठी अपयशी ठरले, असे म्हणता येणार नाही परंतु त्याचे कठीण आव्हान स्टॅलिनसमोर असेल. सुदैवाने तामिळनाडूकडे कुशल नोकरशाही असून ती सरकारला कामात मदत करते. कोविडच्या स्थितीवर लक्ष ठेवण्याबरोबरच तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी स्टॅलिनना तयारी करावी लागेल. यात राज्यातील लसीकरणाचा देखील प्रामुख्याने समावेश आहे.
राज्यात कोविडबाधितांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. ऑक्सिजन आणि बेडची कमतरता जाणवत आहे. राज्यातील आर्थिक स्थिती देखील नाजूक आहे. मार्च 2021 मध्ये राज्यावर 5.7 लाख कोटींचे कर्ज असल्याचे निष्पन्न झाले आहे. फेबुव्रारीत पलानीस्वामी यांनी आर्थिक तुटीचा हंगामी अर्थसंकल्प सादर केला. लॉकडाऊनमुळे आणि बाजारपेठ बंद राहत असल्याने आर्थिक आघाड्यावर करसंकलन देखील कमीच राहिले आहे.
पक्षाने स्थानिकांना 75 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे आणि पुढील पाच वर्षांत दरवर्षी दहा लाख नोकरी देण्याचे देखील आश्वासन दिले आहे. मनरेगाच्या कामाचे दिवस हे शंभरवरून दीडशेपर्यंत वाढवण्याचे आश्वासन स्टॅलिन यांनी दिले आहे. शिक्षण क्षेत्रावरून देखील अनेक आव्हाने आहेत. कोविडच्या काळात शाळा आणि महाविद्यालयांना ऑनलाइन क्लास घेण्याचे बंधन घातले आहे.
बहुतांश शाळा आणि कॉलेज बंद आहेत आणि या ठिकाणी “नीट’ परीक्षेच्या विरोधात आंदोलन होत आहे. त्यामुळे याकडेही स्टॅलिन यांना लक्ष द्यावे लागेल. केंद्राबरोबर देखील समन्वय साधणे हे त्यांना आव्हात्मक ठरू शकते. कलम 370, सीएए या मुद्द्यावरून केंद्राशी वाद घालण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे स्टॅलिन यांनी संकेत दिले आहेत. स्टॅलिन यांना आठ घटक पक्षांना सोबत घेऊन चालावे लागणार आहे. त्यांच्यात ताळमेळ बसवावा लागेल. स्टॅलिन हे आघाडीचे नेते म्हणून समोर आले आहेत.
पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत या घटक पक्षांना एकत्र ठेवणे हे देखील जोखमीचे काम करावे लागणार आहे. स्टॅलिन यांना कौटुंबिक समस्यांनी देखील घेरले आहे. स्टॅलिन यांना चिरंजीव उदयनिधी यांना समोर आणायचे आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर द्रमुक पक्षाने स्टॅलिननाच सर्वेसर्वा मानले आहे. स्टॅलिन यांना राजकारणाचा मोठा अनुभव आहे. त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव देखील चांगला आहे.
ते 1996 मध्ये चेन्नईचे महापौर होते. 2006 मध्ये स्थानिक प्रशासकीय मंत्री, 2009 ते 2011 पर्यंत उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी राष्ट्रीय पक्षाबरोबर देखील चांगले संबंध ठेवले आहेत. परंतु तामिळनाडूचा आणखी एक करुणानिधी होण्यासाठी स्टॅलिन यांना बराच पल्ला गाठायचा आहे.
– कल्याणी शंकर