पुणे -शहरातील किराणा दुकान उघडण्याची वेळ वाढवून सकाळी 9 ते दुपारी 3 करावी. यामुळे दुकानदारांना घाऊक बाजारातून माल खरेदी करता येईल आणि तो दुकानात उतरवून घेता येईल. सध्या सकाळी 11 पर्यंत दुकान उघडे ठेवण्याची मुभा आहे. परंतु, यातील निम्मा वेळ दुकान उघणे आणि बंद करण्यातच जात आहे. त्यामुळे दुकानाची वेळ वाढवून देण्यात यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
व्यापाऱ्यांच्या बाबतीत सरकारने दिलेल्या आदेशांच्या संदर्भात नेहमीच व्यापारी कटिबद्ध आहेत. त्यांनी दिलेल्या कायद्याचे तंतोतंत पालन केले जाते आहे. परंतु, सध्या व्यापारासाठी दिलेली सकाळी 7 ते 11 या वेळेचा प्रत्यक्षात काहीच उपयोग होत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सकाळी 7 वाजता दुकाने उघडून माल बाहेर लावावा लागतो. तसेच, दुकानातील कामगारही उशिरा येतात. तसेच, ग्राहकांनी दिलेली यादी तयार करण्यात वेळ जातो. त्यामुळे यातील निम्म्यापेक्षा जास्त वेळ दुकान उघणे आणि बंद करण्यातच जात आहे.
दि पूना मर्चंटस् चेंबरचे सचिव विजय मुथा म्हणाले, मार्केट यार्डात नियमित शेंगदाणा, तेल, साखर, तूप, साबुदाणा यासह विविध अत्यावश्यक माल घेण्यासाठी ग्राहक येतो. भुसार बाजार सकाळी साधारण 9:30 ते 10 पर्यंत सुरू होतो. तसेच हमाल, कामगार यांनाही यायला वेळ होतो. तसेच मार्केट यार्डात माल भरेपर्यंतच आकरा वाजतात. तोपर्यंत दुकाने बंद करण्याची वेळ झालेली असते. त्यामुळे माल दुकानी जाऊन उतरावयाचा प्रश्न निर्माण होतो. प्रशासनाने वेळ वाढवून देण्याची गरज आहे. यामुळे दरवाढ आणि अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही.