मुंबई -करोनामुळे बऱ्याच शहरात लॉक डाऊन सुरू करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत भारतीय उद्योगांची उत्पादकता कमी होऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदार शेअर बाजारातील गुंतवणूक काढून घेत आहेत.
शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 0.42 टक्क्यांनी म्हणजे 202 अंकांनी कमी होऊन 47,878 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 64 अंकांनी कमी होऊन 14,341 अंकांवर बंद झाला. दूरसंचार, रिऍल्टी, तंत्रज्ञान, ग्राहक वस्तू, माहीती तंत्रज्ञान या क्षेत्राना आज विक्रीचा मारा सहन करावा लागला. उर्जा, वित्त क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची बऱ्यापैकी खरेदी झाली.
आयसीआयसीआय बॅंक, इन्फोसिस, महिंद्रा, डॉ. रेड्डीज, भारती एअरटेल, टेक महिंद्रा या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. याबाबत रिलायन्स सिक्युरिटीजचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, दिवसभर बाजारात अनिश्चितता होती. बाजार बंद होताना विक्रीचा जोर वाढला. सरकारी बॅंका वगळता इतर क्षेत्रावर विक्रीचा परिणाम झाल्याचे दिसून आले. कोटक सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रश्मीक ओझा यांनी सांगितले की, या आठवड्याच्या कामकाजावर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या विक्रीचा बराच परिणाम झाला आहे.
रुपयाचा भाव फारच कमी झाला आहे आणि डॉलर वाढत आहे. त्यामुळे परदेशी संस्था गुंतवणुकदारांना अशा परिस्थितीमध्ये कमी परतावा मिळतो. मोठ्या कंपन्यापेक्षा छोट्या कंपन्यावर जास्त परिणाम होऊ शकतो. त्यामुळे छोट्या कंपन्यातून जास्त गुंतवणूक बाहेर जाऊ शकते असे त्यांनी सांगितले.
लॉक डाऊनच्या काळात लोक खर्च करणार नाहीत. त्यामुळे मागणी कमी होईल आणि कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होईल असे गुंतवणूकदारांना वाटणे सहाजिक आहे. भारतात काल 3.32 लाख इतक्या नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर एकूण करोना रुग्णांची संख्या 1.62 कोटीच्या पुढे गेली आहे. जागतिक बाजारातही कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे.