नवी दिल्ली – देशातील ऑक्सिजनची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी आता ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेच्या माध्यमातून केला जाणार आहे. महत्त्वाच्या मार्गिकांवर द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू अर्थात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करण्यासाठी रेल्वे पूर्णपणे सज्ज झाली आहे.
रेल्वेच्या माध्यमातून विशेष ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरू केली जाणार असून, त्यातून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक केली जाणार आहे. रेल्वेच्या माध्यमातून आज ही माहिती देण्यात आली आहे. या ऑक्सिजन एक्स्प्रेसला मुंबईजवळील कळंबोली आणि बोईसर रेल्वे स्थानकातून उद्या सुरुवात होईल आणि ही ऑफ ऑक्सिजन एक्स्प्रेस विजाग जमशेदपूर रौर्केला आणि बोकारो येथे वैद्यकीय द्रवरूप ऑक्सिजन पोहोचतील.
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य सरकारने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टॅंकर्स रेल्वेने नेता येऊ शकतील का याची चाचपणी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधला होता. रेल्वेने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन वाहतुकीची तातडीने तांत्रिक व्यवहार्यता तपासली. फ्लॅट वॅगन्सवर ठेवलेल्या रोड टॅंकरसह रोल ऑन रोल ऑफ अर्थात “रोरो’ सेवेद्वारे एलएमओची वाहतूक करावी लागेल. काही ठिकाणी पुलांवरील रस्ते आणि ओव्हरहेड इक्विपमेंट्सच्या उंचीच्या निर्बंधांमुळे विविध आकाराच्या रस्ते टॅंकरपैकी रोड टॅंकर, फ्लॅट वॅगनवर ठेवता येतील. वाहतुकीच्या मापदंडांची चाचपणी करण्यासाठी, विविध ठिकाणी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. हे रिकामे टॅंकर मुंबई व आसपासच्या कळंबोली, बोईसर, रेल्वे स्थानकांमधून हलवले जातील आणि तेथून द्रवरूपी वैद्यकीय ऑक्सिजन टॅंकर लोड करण्यासाठी विशाखापट्टणम आणि जमशेदपूर, रुरकेला, बोकारो येथे पाठवले जातील.
विविध ठिकाणी टॅंकर हलविण्याच्या दृष्टीने रेल्वेने कळंबोली आणि अन्य ठिकाणी डीबीकेएम वॅगन यापूर्वीच तयार ठेवल्या आहेत. टॅंकर हलवण्यासाठी रेल्वे महाराष्ट्राकडून सूचना मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. 19 एप्रिल रोजी 10 रिकामे टॅंकर पाठवण्यासाठी तात्पुरता वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे.
रेल्वे बोर्डाने संबंधित महाव्यवस्थापकांना पूर्णपणे सज्ज राहण्याचे आणि रेल्वेद्वारे ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी राज्य व केंद्र सरकारच्या संस्थांना सक्रिय सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून करोना रुग्णांसाठी बेड आणि ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
दिल्लीतील सरकारी रुग्णालयांमधील दहा हजारपैकी सात हजार बेड करोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याची मागणी ही केजरीवाल यांनी केली आहे. देशातील करोना संसर्गाचे प्रमाण गेल्या 12 दिवसांमध्ये 8 टक्क्यांवरून 16.69 टक्के झाले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सांगितले. देशातील लसीकरणाच्या मोहिमेने केवळ 92 दिवसांमध्ये बारा कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे आणि अशी कामगिरी करणारा एकमेव देश आहे. भारतापाठोपाठ अमेरिकेने बारा कोटी लसीकरण 97 दिवसांत आणि चीनने एकशे आठ दिवसांत पूर्ण केले आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.