नवी दिल्ली – देशातील बॅंकांकडून मुद्रा योजनेत आत्तापर्यंत 28 कोटी 68 लाख लाभार्थ्यांना 14 लाख 96 हजार कोटी रूपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी 8 एप्रिल 2015 मध्ये ही योजना सुरू केली होती.
गरीब व उपेक्षित वर्गातील लोकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी बॅंकांमार्फत कर्ज दिले जाते. त्याच्या आधारे ही योजना राबवण्यात येत आहे. या मदतीद्वारे गरजुंच्या उद्यमशिलतेला वाव दिला जात असून त्यांच्या पंखांना बळ दिले गेले आहे असे अर्थमंत्रालयाने या संबंधात म्हटले आहे. या योजनेतून चालू आर्थिक वर्षात एकूण 4 लाख 20 हजार कोटी रूपयांचे कर्ज मंजुर करण्यात आले असून त्यातील 2 लाख 66 हजार कोटी रूपयांची रक्कम प्रत्यक्षात वितरीतही करण्यात आली आहे. मुद्रा योजनेत दहा लाख रूपयांपर्यंतचे कर्ज दिले जात असून त्यासाठी जामीनदार देण्याची गरज नाही.व्यापार, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील व्यवसायासाठी हे कर्ज दिले जाते.