भामा आसखेडमधून पाणी सोडले
मांडवगण फराटा – भीमानदीला शेतीसाठी पाणी सोडावे यासाठी भीमानदी तीरावरील सर्व गावाच्या सरपंच यांनी पाटबंधारे विभाग, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. दोन्ही तालुक्यांतील आजी- माजी आमदार यांनी प्रयत्न केला. त्यामुळे भीमा नदीमध्ये भामा आसखेड धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील पूर्व भागातील नागरगाव, वडगाव रासाई, सादलगाव, मांडवगण फराटा, बाभूळसर बुद्रुक, गणेगाव दुमाला या भीमा नदीच्या काठावर असणाऱ्या गावांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली होती. कांदा, ऊस, भाजीपाला, फळबागा ही पिके पाण्यावाचून जळण्याच्या परस्थितीत आली होती. हीच परिस्थिती शेजारील दौंड तालुक्यातील वाळकी, देलवडी, पारगाव, हातवळण, कानगाव, गार या गावांतील शेतकऱ्यांना पाणीटंचाई भेडसावत होती.
रमेश थोरातांकडून कार्यवाही
भीमा नदीच्या पाण्यावर दौंड व शिरूर तालुक्यांतील शेती अवलंबून आहे. ऐन उन्हाळ्यात नदीचे पाणी संपले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माजी आमदार रमेश थोरात यांनी परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. त्यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांना सूचना दिल्या. भामा आसखेडचे कार्यकारी अभियंता एस. एन. गुंजाळ यांना पाणी सोडण्याची मागणी केली असता त्यांनी सांगितले की, बंधाऱ्याच्या प्लेटा काढल्या तरच पाणी सोडता येईल.
खडकवासला कार्यकारी अभियंता श्वेता वाय. कुऱ्हाडे यांना बंधाऱ्याच्या प्लेटा काढण्याची मागणी केली. त्यांनी कार्यवाही केली. त्यामुळे शिरूर, दौंड तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पाणी लवकर पोहोचले.
पाणी जपून वापरा- पवार
शिरूर-हवेली विद्यमान आमदार अशोक पवार यांनी सांगितले की, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून पाणी सोडण्यात यश मिळाले. उन्हाळ्याचे दिवस आहेत. सर्वानी पाणी जपून वापरावे. आजचा पाणी प्रश्न काही अंशी सुटला असला तरीही धरणात पाणी साठा कमी असल्याने पुन्हा आवर्तन होईल, याची खात्री नाही.