वॉशिंग्टन – भारतातील अर्थकारण सुरळीत होत असल्याचे संकेत मिळत आहेत असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अर्थतज्ज्ञ गीता गोपिनाथ यांनी म्हटले आहे. भारताचा विकास दर सन 2021 या वर्षात 12.5 टक्क्यांवर जाईल असे संकेत आयएमएफने कालच दिले होते. त्या पार्श्वभूमीवर गीता गोपिनाथ यांनी म्हटले आहे की, गेल्या दोन महिन्यांपासून भारतात नियमीत व सुरळीत स्वरूपात आर्थिक हालचाली सुरू झाल्या आहेत.
सन 2020 च्या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर हा शुन्याच्या खाली गेला होता. त्यामुळे भारतासारखी मोठी विकसनशील अर्थव्यवस्था फारच रसातळाला गेल्याने त्याचा आंतरराष्ट्रीय अर्थकारणावरही विपरीत परिणाम होण्याची स्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर भारताचे अर्थकारण नेमके कधी सावरणार याकडे जगातील अर्थतज्ज्ञांचे लक्ष लागून राहिले आहे.
त्यामुळे भारताने जरा जरी प्रगती केली तरी ते एक मोठेच लक्षण मानावे लागेल असे त्यांनी आज येथे एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. करोनामुळे साऱ्या जगाचेच अर्थकारण बिघडले असून त्याच्या रिकव्हरीकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.