रायपूर : छत्तीसगडमध्ये अलीकडेच झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे २२ जवान शहीद झाले आहेत. देशातील प्रत्येक नागरिक या घटनेचा निषेध करून नक्षलींविरोधात सरकारने कडक कारवाई करण्याची मागणी करत आहे. पण तिकडे आसाममधील एका ४८ वर्षीय लेखिकेने जवानांच्या बलिदानावर फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट केली.
मंगळवारी या लेखिकेला देशद्रोहासह अन्य आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. गुवाहाटी पोलीस आयुक्त मुन्ना प्रसाद गुप्ता म्हणाले की, लेखिका शिखा सरमा यांच्यावर विविध कलमं ज्यात IPC १२४ अ(देशद्रोह) याचाही समावेश आहे. या लेखिकेला अटक करण्यात आली आहे. शिखा सरमा या लेखिकेने फेसबुकवर लिहिले होते की, पगार घेणारे कामगार जर ड्यूटीवेळी मरत असतील तर त्यांना शहीद कसं बोलू शकतो. याच लॉजिकनुसार जर वीज विभागातील कर्मचारी जो करंट लागून मृत्युमुखी पडतो त्यालाही शहीद म्हटले पाहिजे. मीडियाच्या लोकांनी भावूक बनू नये असे या लेखिकेने म्हटले आहे.
शिखा सरमाची ही फेसबुक पोस्ट सोशल मीडियात चर्चेचा केंद्रबिंद बनली आहे. मोठ्या संख्येने लोकं याचा विरोध करत आहे. सोमवारी गुवाहाटी हायकोर्टाचे वकील उमी डेका बरुआ आणि कंगकना गोस्वामी यांनी दिसपूर पोलीस स्टेशनमध्ये या विरोधात FIR नोंदवली आहे. तक्रारकर्त्यांनी शिखाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिखाचे विधान हे शहीद जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे. ही पोस्ट राष्ट्र भावनेतून सेवा करणाऱ्यांवर हल्ला आहे. दिसपूर पोलीस स्टेशनने याबाबत तक्रार नोंदवून घेत शिखा सरमाला अटक केली आहे.