नेपियर – न्यूझीलंड व बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात चक्क डकवर्थ-लुईस या नियमाचेच हसू झाले. नियमानुसार पहिल्या संघाचा डाव पूर्ण होणे अपेक्षित असते. मात्र, न्यूझीलंडचा डाव प्रथम फलंदाजी करताना पूर्णच होऊ शकला नसल्याने बांगलादेशचा डाव सुरू होऊन तीन चेंडूंचा खेळ होईपर्यंत लक्ष्यच दिले गेले नाही. अखेर काही वेळाने लक्ष्य दिले गेले व सामना सुरू झाला आणि यजमान न्यूझीलंडने याच गणिती पद्धतीच्या आधारे हा सामना जिंकला.
न्यूझीलंडची फलंदाजी सुरू असताना पावसाचा व्यत्यय आला. यावेळी डावातील 18 वे षटक सुरू होते व त्यातील 5 चेंडूंचा खेळही झाला होता. त्यावेळी न्यूझीलंडच्या 5 बाद 173 धावा झाल्या होत्या.
पावसामुळे त्यांचा डाव थांबवण्यात आला व बांगलादेशची फलंदाजी सुरू झाली. मात्र, टीम साऊदीने पहिले षटक सुरू केले व त्यातील तीन चेंडूंचा खेळ झाला मात्र, तरीही लक्ष्य दिले गेले नव्हते. अखेर सामनाधिकारी व पंचांनी नियमाची पाहणी करून 16 षटकांत 148 धावांचे लक्ष्य दिले.
हे षटक पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा सामनाधिकारी व पंचांनी चर्चा केली व गणित चुकल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा 171 धावांचे नवे लक्ष्य देण्यात आले. निर्धारित 16 षटकांत बांगलादेशला 7 बाद 142 धावाच करता आल्या व त्यांना 28 धावांनी हा सामना व ही मालिकाही गमवावी लागली.