मुंबई, – निलंबीत पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा पोलिस सेवेत घेतले तर ते मोठीच समस्या निर्माण करतील असा इशारा आपण आधीच काही नेत्यांना दिला होता असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. वाझे प्रकरणाने महाविकास आघाडी सरकारला काही धडे शिकवले आहेत त्यातून सरकारने बोध घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.
एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की वाझे यांची त्यांची वर्तणूक आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीतून सरकारलाच अडचणी निर्माण होतील असा इशारा मी काहीं नेत्यांना या आधीच देऊन ठेवला होता. आपण स्वत: पत्रकार म्हणून काम केले आहे आणि त्यामुळे मला वाझे यांच्या विषयी खूप माहिती आहे असेही त्यांनी म्हटले आहे. असे असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाझे यांना का पाठीशी घातले असे विचारता राऊत यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांना वाझे यांच्या विषयी पुरेशी माहिती नसावी.
अमित शहा आणि शरद पवार यांच्या भेटी विषयी विचारले असता ते म्हणाले की, या भेटीला फार महत्व देण्याची गरज नाही. परस्पर विरोधी असलेल्या पक्षाच्या नेत्यांमध्ये संवाद असणे अधिक चांगले आहे असे मतही राऊत यांनी व्यक्त केले आहे.