नवी दिल्ली, दि. 26 – देशात उन्हाळी खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत असून यंदा आत्तापर्यंत 56 लाख 50 हजार हेक्टरवर उन्हाळी खरीप पिकांची लागवड झाली आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे.
ज्या ठिकाणी रबी पिकांची कापणी झाली आहे त्या क्षेत्रावर शेतकरी उन्हाळी खरीपाची पिके घेतात. देशातील रबी पिकांची कापणीचा हंगामही वेगात असून आत्तापर्यंत 48 टक्के रबीची कापणी पुर्ण झालीा आहे. रबीची कापणी किंवा उन्हाळी खरीपाच्या लागवडीवर करोना प्रादुर्भावाचा कोणताही दुष्परिणाम झालेला नाही असेही कृषी मंत्रालयाने म्हटले आहे.
ज्या क्षेत्रावर आत्तापर्यंत उन्हाळी खरीपाची लागवड झाली आहे त्यात 31 लाख 62 हजार क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. हे क्षेत्र प्रामुख्याने पश्चिम बंगाल, तेलंगणा, कर्नाटक, आसाम, आंध्रप्रदेश, ओडिशा या राज्यात आहे.7 लाख 20 हजार हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची लागवड आत्तापर्यंत करण्यात आली आहे. तर 5 लाख 53 हजार हेक्टर क्षेत्रावर कडधान्यांची लागवड करण्यात आली आहे.