पुणे – यावर्षीच्या अकरावीच्या प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांसाठी पुन्हा प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर प्रवेश दिले जाणार असून, प्रवेशासाठी 26 मार्चची मुदत देण्यात आली आहे. अकरावी प्रवेशासाठी ही अखेरची संधी आहे.
शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी या प्रवेश प्रक्रियेबाबत परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहेत. अद्यापही काही विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशापासून वंचित राहिल्याचे निदर्शनास आले आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याबाबत शासनाकडे विनंती करण्यात आली आहे.
या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी 26 मार्चपर्यंत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर प्रवेश घेण्यात मान्यता देण्यात येत आहे. 26 मार्चनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात येऊ नये.
प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांसाठीच ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल. पसंतीक्रम बदलणे अशा कारणांसाठी पुन्हा प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्याची संधी देता येणार नसल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे.