पुणे – पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी लष्कर न्यायालयात दाखल असलेले दोन्ही खासगी दावे न्यायालयाने फेटाळले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रोहिणी पाटील यांनी याबाबत आदेश दिला. फोटो आणि कॉल रेकॉर्डिंग हे गुन्हा दाखल करण्यासाठी सक्षम पुरावे नसल्याचे आदेशात म्हटले आहे.
“या प्रकरणाची वानवडी पोलिसांनी चौकशी करावी. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा,’ अशी मागणी या खटल्यांत करण्यात आली होती. भाजप वकील आघाडीच्या अध्यक्ष ऍड. ईशानी जोशी आणि लीगल जस्टिस सोसायटीतर्फे ऍड. भक्ती पांढरे यांनी खटला दाखल करण्यासाठी अर्ज केले होते. त्यानुसार या प्रकरणांत दोन खासगी दावेदेखील झाले होते.
“या प्रकरणात राजकीय व्यक्तीचा सहभाग आहे. त्यामुळे घटनेची सखोल चौकशी झालेली नाही. या प्रकरणात कोणाचा हात नाही, असे पोलीसही स्पष्ट करत नाहीत. त्यामुळे प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना द्यावेत,’ यासाठी हे दावे दाखल करण्यात आले होते.
राजकीय दबावातून पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत, असा मुद्दा या निमित्ताने उपस्थित झाला होता. मात्र, पूजा हिच्या कुटुंबातील कोणीही तक्रार करण्यासाठी पुढे आले, तर फिर्याद दाखल करू अशी भूमिका पोलिसांनी घेतली होती. यात ठोस पुरावा नसून, पोलिसांनी या प्रकरणात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्याचा तपास अद्याप सुरू आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.