नवी दिल्ली – गेल्या आठवड्यात शेअर बाजाराचे कामकाज तांत्रिक बिघाडामुळे चार तास बंद ठेवावे लागले होते. यापासून डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणांनी धडा घ्यावा. त्याचबरोबर डिजिटल पेमेंट यंत्रणेत बिघाड होऊ नये याकरिता काळजी घेण्याची गरज असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
45 व्या सिव्हिल अकाऊंट्स डे निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सीतारामन म्हणाल्या की, डिजिटल पेमेंट यंत्रणेमध्ये बिघाड होऊ नये याकरिता लघू आणि दीर्घ पल्ल्याच्या उपाय योजना तयार ठेवल्या पाहिजेत.
महालेखापाल आपल्या हिशेब यंत्रणेत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करीत आहेत याबद्दल अर्थमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. शेअर बाजारात अशा प्रकारचा तांत्रिक बिघाड होऊ शकतो असे या कुणालाही वाटले नव्हते. परंतु गेल्या आठवड्यात तो प्रकार घडला. या पासून इतर यंत्रणांनी आवश्यक त्या पर्यायी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होते, असे अर्थमंत्री म्हणाल्या.