‘आयव्हीएफ’ तज्ज्ञांचे मत; हार्मोनल असंतुलन वाढल्याचे निरीक्षण
पुणे – देशात करोना साथ आणि लॉकडाउनमुळे रोजगार संकट, पगार कपात आणि आर्थिक असुरक्षिततेमुळे दाम्पत्यांच्या नात्यात तणाव वाढताना दिसत आहे. त्याचा परिणाम नैसर्गिक गर्भधारणेवर होत आहे, असे निरीक्षण शहरातील “आयव्हीएफ’ तज्ज्ञांनी नोंदविले. सध्या उपचारांसाठी येणाऱ्या पाच किंवा सहापैकी एका जोडप्याला कृत्रिम गर्भधारणा (आयव्हीएफ) उपचारांची गरज भासत आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
करोना संकटाच्या प्रारंभी लॉकडाउन लागू केल्यानंतर अनेक क्षेत्रांत घरातून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यावेळी अनेक जोडप्यांना नैसर्गिक गर्भधारणा झाली; परंतु काहींनी साथरोग आणि नोकरीच्या अस्थिरतेची चाहूल यामुळे मूल जन्माला घालणे टाळले. त्यातच लॉकडाउनचा कालावधी वाढल्यानंतर रोजगार गेल्याने अनेकांची आर्थिक स्थितीही खालावली.
या सगळ्या परिस्थितीत मानसिक आणि हार्मोनल असंतुलन वाढल्याने शुक्राणू, स्त्रीबिजांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. घरात बसून राहण्यामुळे लठ्ठपणाही वाढला. या सर्व बाबींमुळे नैसर्गिक गर्भधारणेमध्ये अडचणी येत असून, आता करोना साथ नियंत्रणात आल्यानंतर अनेक जोडपी कृत्रिम गर्भधारणा उपचारपद्धतीकडे वळत आहेत, असे मत “आयव्हीएफ’ तज्ज्ञांनी व्यक्त केले.
ही समस्या केवळ शहरात नसून, ग्रामीण भागातही त्याचे प्रमाण वाढते आहे. कामाच्या वेगवेगळ्या वेळा, प्रवासाला लागणारा वेळ आदी बाबींमुळे अनेक जोडप्यांना एकमेकांना वेळ देता येत नाही. त्यामुळे नैसर्गिक गर्भधारणेत समस्या निर्माण होताना दिसतात, असेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
“इनफर्टिलिटी’चे प्रमाण दुपटीने वाढले
उशिरा लग्न, करियर, गर्भनिरोधक गोळ्यांचे जास्त काळ सेवन, ताणतणाव, डळमळीत नोकरी या आणि अन्य कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून वंध्यत्वाचे प्रमाण वाढत असल्याने, कृत्रिम गर्भधारणेने मूल जन्माला घालणाऱ्या जोडप्यांची संख्याही वाढत आहे. गेल्या 35 ते 40 वर्षांत हे “इनफर्टिलिटी’चे प्रमाण दुपटीने वाढले असून, पाच किंवा सहापैकी एका जोडप्याला कृत्रिम गर्भधारणा उपचारांचा आधार घ्यावा लागत आहे.