अंजीरचं शास्त्रीय नाव फायकस कॅरिका असं आहे. हे फळ उंबरवर्गीय आहे. हे झाड नैऋत्य आशिया आणि पूर्व भूमध्य विभागात आढळतं. इराण आणि इतर भूमध्यसागरी भागांत अंजिराचं झाड नैसर्गिकरित्या उगवतं आणि तिथलं ते मुख्य खाद्य फळ आहे. या झाडाच्या चिकाने माणसाची त्वचा जळजळते. मात्र हे फळ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय परिपूर्ण आहे. या फळातून शरीराला लोह, जीवनसत्त्व ए, बी, सी ब-याच प्रमाणात मिळतं. तसंच त्यात साखरेचं प्रमाण असल्यामुळे हे फळ शक्तिवर्धक आहे.
अंजीर पचनास जड, पण शीतदायी आहे. सुक्या अंजिरामध्ये असणा-या लोहामुळे आपलं शरीर आणि जठर क्रियाशील बनतं, त्यामुळे भूक लागते. अंजीरच्या सेवनामुळे पित्तविकार, वायुविकार आणि रक्तविकार दूर होतात. हे फळ रोज खाल्ल्याने मलावरोध नाहीसा होतो.
अंजीर दूधात गरम करून सकाळ आणि संध्याकाळ खाल्ल्याने कफाचं प्रमाण कमी होतं तसंच दम्याचा विकारही नाहीसा होतो. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी अंजीर उपयुक्त आहे. हे फळ हृदयरोगावरही अतिशय गुणकारी आहे. अपचन, अॅसिडीटी, गॅसेस याचा ज्यांना वारंवार त्रास होतो त्यांनी सकाळ-संध्याकाळ एक ते दोन अंजीर खावेत किंवा याचा रस प्यावा.
या फळाच्या सेवनाने बौद्धिक आणि शारीरिक थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून तीन-चार वेळा अंजीर खावेत, त्यामुळे मूत्रविकार दूर होतात. अशक्तपणा जाणवत असल्यास अंजीर खावेत, त्याचा फायदा होतो. त्वचा विकार, त्वचेची आग व कांजण्या यांसारख्या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावा.
सारक असल्यामुळे बद्धकोष्ठतेची तक्रार दूर होते. पाळी असताना रक्तस्त्राव कमी होत असेल किंवा ज्यांच्या अंगात हिमोग्लोबिनची कमतरता असेल अशांनी रोज एक-दोन अंजीर खावेत. सुके अंजीर दररोज खाल्ल्याने हाडं मजबूत होतात. गळ्याला सूज आली असेल तर सुके अंजीर पाण्यात उकळून ते बारीक करून खावेत, फायदा होतो.
दोन अंजीर मधोमध कापून ते एक ग्लास पाण्यात रात्रभर ठेवावेत आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्यायल्याने रक्तसंचार वाढतो. सतत तहान लागत असेल तर अंजीर खावेत. तोंड येत असेल तर अंजीराचा रस त्यावर लावावा, आराम पडतो. हिरडय़ातून रक्त येत असेल तर अंजीर पाण्यात उकळवावेत, या पाण्याने चूळ भरावी. त्याने रक्त येणं कमी होतं. कोरडय़ा खोकल्याचा त्रास वारंवार जाणवत असेल तर अंजीर खावा. खोकला होत नाही.
छातीत कफ जमा झाला असेल तर अंजीर आणि पुदिना एकत्र करून खावा, त्याने कफ सुटतो. स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती दीर्घकाळापर्यंत व्यवस्थित ठेवण्याचं काम अंजीर करतं. मीठाचं प्रमाण शरीरात जास्त झालं की सोडियमचं प्रमाण शरीरात जास्त होतं. परिणामी, शरीरातील सोडियम-पोटॅशियमच्या पातळीत बदल होतो आणि हायपरटेंशन होतं. अशा वेळी अंजीर सेवन करावं, कारण त्यामुळे सोडियम-पोटॅशियमच संतुलन व्यवस्थित राहतं.
मधुमेह असणा-यांना अंजीर उपयुक्त आहे. पण सुके अंजीर हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावं. कमरेचा ज्यांना वारंवार त्रास होतो अशांनी सूंठ, अंजीराची साल आणि कोथिंबीर याचं सारखं प्रमाण घेऊन ते पाण्यात भिजवून ठेवावं. नंतर ते बारीक वाटून घ्यावं. सकाळी हे पाणी गाळून प्यावं. त्याने कमरेचा त्रास कमी होतो.
अंजीरमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असल्याने त्याचं सेवन नियमित केलं तर वजन कमी होण्यास मदत होते. कर्करोग होऊ नये म्हणून अंजीर खावं.
पोटात केस गेल्यावर अंजीर खाल्ल्यास त्याचं पाणी होतं. लहान मुलाने काचेचा तुकडा खाल्ल्यास त्याला लगेच अंजीर खायला द्यावा. काचेचा तुकडा शौचावाटे बाहेर पडतो. बहुगुणी अंजीर उपयोगी असला तरीही त्याचं जास्त सेवन झालं तर पचनास जड होतो, परिणामी पोटदुखी होऊ शकते.