पिंपरी – गेल्या चार दिवसांत पिंपरी-चिंचवडकरांना ऋतुचक्रातील तीनही ऋतुंचा अनुभव घेता आला आहे. उन्हाळा, पावसाळा आणि त्यानंतर वातावरणात वाढलेल्या गारठ्याने या तीनही ऋतुंचे शहरात अस्तित्व जाणवले. मात्र अचानकपणे वातावरणातील या बदलाने अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे.
सध्या वातावरणातील बदलाने ऋतुचक्रात मोठा बदल झाला आहे. ऐन हिवाळ्यात थंडी गायब झाल्याने वातावरणातील उकाडा वाढला होता. डिसेंबर महिन्यात तर पिंपरी-चिंचवडकर उकाड्याने पुरते हैराण झाले होते. त्यानंतरही वातावरणात फारसा फरक पडला नाही. त्यानंतर हवामान विभागाने 16 ते 20 फेब्रुवारीदरम्यान पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यापैकी 17 आणि 18 फेब्रुवारीला अवकाळीने शहर व परिसरात हजेरी लावली. त्यानंतर वातावरणात अचानक गारठा वाढला आहे.
तर आणखी आठवडाभर थंडीचा मुक्काम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र वातावरणातील उकाडा दुपारी वाढत असल्याचे ऐन थंडीतील चित्र पहायला मिळत आहे. तर रात्री मात्र थंडी जाणवत आहे.
वातावरणात अचानक झालेला बदल सहन करण्याची मानवी शरिराची क्षमता नसते. त्यामुळे अचानक झालेल्या बदलाने अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. त्यामुळे शहरात काही दिवसांत सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत.