मुंबई – अर्थ मंत्रालय सरकारी बॅंकांचे खासगीकरण करण्याबाबत गंभीरपणे विचार करीत असून यासाठी चार बॅंकांची यादी तयार करण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिल्यानंतर मंगळवारी या चार बॅंकांच्या शेअरच्या भावात मोठी वाढ झाली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना दोन सरकारी बॅंका आणि एका वीमा कंपनीतील सरकारचे भाग भांडवल कमी करणार असल्याचे सांगितले होते. मात्र काही माध्यामानी दिलेल्या माहीतीनुसार सरकारने यासाठी चार बॅंकांची यादी बनविली आहे. यात सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि बॅंक ऑफ इंडियाचा समावेश आहे. या वृत्ताला अर्थमंत्रालयाने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
वृत्तसंस्थांनी सरकारी अधिकाऱ्यांचा हवाला देऊन ही माहिती दिली आहे. मंगळवारी शेअर बाजार निर्देशांकात अल्प प्रमाणात घट झाली असली तर या चार बॅंकांच्या शेअरच्या भावात मात्र मोठी वाढ झाली. बॅंक ऑफ महाराष्ट्राचा शेअर 19.50 टक्क्यानी, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचा शेअर 16.70 टक्क्यानी, इंडियन ओव्हरसीज बॅंकेचा शेअर 13.10 टक्क्यांनी तर बॅंक ऑफ इंडियाचा शेअर 19.97 टक्क्यांनी वाढला.
याचार बॅंकांच्या शेअरच्या भावात वाढ झाली असली तरी इतर बॅंकांच्या शेअरच्या भावात मात्र घट झाली. ऍक्सिस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, स्टेट बॅंकेचे शेअर आज घसरले. त्याचबरोबर नेस्ले इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. असे असले तरी पावर ग्रिड, ओएनजीसी, कोटक बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स केवळ 49 अंकांनी म्हणजे 0.10 टक्क्यांनी कमी होऊन 52,104 अंकांवर बंद झाला.
सकाळी बरीच विक्री होऊनही नंतर सुधारणा झाल्यामुळे सेन्सेक्सला 52,000 अंकांची पातळी दुसऱ्या दिवशी कायम राखण्यात यश मिळाले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक एक अंकाने कमी होऊन 15,313 अंकांवर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्यांनी आज सपाटून मार खाल्ला. मात्र उर्जा,धातू, तेल आणि नैसर्गिक वायू व आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
मिड कॅप व स्मॉल कॅप आघाडीवर
ब्यूचीप कंपन्यांच्या शेअरचे भाव मुख्य निर्देशांक वाढल्यामुळे आवाक्याबाहेर गेले असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार गेल्या काही दिवसापासून निवडक छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या खरेदीसाठी उत्सुक आहेत. तीसऱ्या तिमाहीच्या ताळेबंदच्या आधारावर छोट्या कंपन्यांच्या खरेदी चालू असल्याचे दिसून येते असे ब्रोकसनी सांगितले. आज मुंबई शेअर बाजाराचा मिड कॅप आणि स्मॉल कॅप अर्धा टक्क्यापर्यंत वाढले.