हैदराबाद – आंध्रप्रदेशातील कर्नुल जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि मिनी बसची धडक होऊन झालेल्या अपघातात चौदा जण ठार झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमाराला घडली. या अपघातातून चार लहान मुले वाचली आहेत पण त्यांच्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे असे पोलिसांनी सांगितले.
वेलदुरूत्ती मंडल गावाजवळ हा अपघात झाला. ही मिनी बस होती. त्यात तीर्थयात्रेला निघालेले एकूण 18 जण होते. ही मिनीबस भरधाव वेगाने चालली असताना ती रोड डिव्हाईडरला धडकून पलटी झाली आणि ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला गेल्याने तिची त्या बाजूकडून येणाऱ्या ट्रकशी धडक झाली. हे प्रवासी अजमेरला चालले होते.
या भागातून अजमेरला जाण्यासाठी रेल्वेगाडी उपलब्ध नसल्याने लोकांना वाहनांनी बाय रोडच या ठिकाणी जावे लागते. हे सर्व यात्रेकरू चित्तुर जिल्ह्याच्या मदनापल्ले गावचे रहिवासी होते. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व आंधप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.