नागपूर : पशुधनाला शेतकऱ्यांच्या बांधावर नाममात्र शुल्कात वेळेत उपचार मिळावेत, यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात 2022 पर्यंत फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू करणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गंत नागपूर विभागात 15 फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालयांना प्रारंभ करण्यात आला.
पहिल्या टप्प्यात नागपूर विभागात फिरत्या 15 पशुवैद्यकीय रुग्णालयांचा आज प्रारंभ करण्यात आला असून, यातील तीन रुग्णालये जिल्ह्यात असतील. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. फिरते पशुवैद्यकीय रुग्णालये ही विभागाची नितांत गरज होती. ती आज पूर्ण करत असल्याचे सांगून येत्या दोन वर्षात राज्यातील प्रत्येक तालुक्यात ही रुग्णालये सुरू होणार असल्याचे केदार यांनी सांगितले.
1962 या नि:शुल्क टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता, वैद्यकीय पथकासह हे फिरते रुग्णालय शेतकऱ्याच्या बांधावर पोहचणार असून, “शासन आपल्या दारी’ योजना सुरु होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या माध्यमातून रोगप्रतिबंधक लसीकरण करता येणार आहे. तसेच उच्च उत्पादक क्षमता असणाऱ्या वळूंच्या रेतमात्रा वापरून कृत्रिम रेतनाचीही सोय शेतकऱ्यांना सहजरित्या उपलब्ध होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना पशुआहार व आरोग्याबाबत तज्ज्ञ पशुवैद्यकामार्फत मार्गदर्शन करण्याचीही व्यवस्था उपलब्ध करुन देणार आहे, असे ते म्हणाले.
बर्ड फ्ल्यूपेक्षा अफवांमुळे जास्त नुकसान
राज्यात बर्ड फ्ल्यू आटोक्यात आला असून, बर्ड फ्ल्यूने माणसांना कोणताही धोका नाही. अद्याप या आजाराने कोणीही दगावला नाही.एका पक्षाला बर्ड फ्ल्यूची लागण झाल्यास 48 तासात त्याच्या पोल्ट्री फार्मचे मोठे नुकसान होते. मात्र त्यापेक्षा जास्त नुकसान समाजमाध्यमांवरील अफवांमुळे होते. भारतीय खाद्यसंस्कृती ही जगात सर्वाधिक सुरक्षित असून, पूर्णत: शिजविलेले चिकन बिनधास्त खाण्याचे आवाहनही केदार यांनी केले. तसेच मांसाहारी नागरिकांमधील भिती काढून टाकण्यासाठी त्यांनी नुकतेच “चिकन फेस्टीव्हल’चे आयोजन केले होते, याची माहितीही त्यांनी दिली. कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांना नाममात्र दरात पक्षांचा विमा उतरविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.