मुंबई – तूट वाढूनही केंद्र सरकारने अर्थसंकल्पात कसलीही करवाढ केली नाही. त्याचबरोबर केंद्र सरकार कर्जाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांवर भर देणार आहे. या कारणामुळे भारतीय शेअर बाजार निर्देशांक सोमवारपासून एकतर्फी वेगाने वाढत आहेत. त्यामुळे भारतात शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य वाढून 200 लाख कोटी रुपयांजवळ गेले आहे.
बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 0.92 टक्क्यांनी म्हणजे 458 अंकानी उसळून प्रथमच 50 हजार अंकाच्या पुढे म्हणजे 50,255 अंकांवर बंद झाला. या अगोदर दोन वेळा सेन्सेक्स 50 हजार अंकाच्या पुढे गेला होता. मात्र बाजार बंद होताना कमी पातळीवर बंद झाला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 142 अंकांनी म्हणजे 14,789 अंकांवर बंद झाला.
जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश येण्याबरोबरच अर्थसंकल्पाने गुंतवणूकदारांसाठी पूरक वातावरण निर्माण केले असल्याची भावना गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे निर्देशांक वाढत आहेत. परिणामी भारतात नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य सध्या 200 लाख कोटी रुपयांच्या जवळ गेले आहेत असे रिलायन्स सिक्युरिटी विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले. आता निर्देशांक सध्याच्या पातळीवर काही प्रमाणात कायम राहण्याची शक्यता असल्यामुळे नजीकच्या भविष्यात फार मोठी विक्री होण्याची शक्यता कमी असल्याचे काही ब्रोकरना वाटते.
कोणत्या कंपन्यांचे शेअर वाढले
इंडसइंड बॅंक, पावर ग्रिड, डॉ. रेड्डीज, सन फार्मा, एनटीपीसी, ऍक्सिस बॅंक
कोणत्या कंपन्यांचे शेअर घसरले
अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, आयटीसी, कोटक बॅंक, एशियन पेंट्स