मुंबई – स्वामिनाथन आयोग लागू करावा, केंद्रिय कृषिआयोगास स्वायत्ता द्यावी, या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उद्यापासून (दि.30) उपोषण करण्याच्या भूमिकेवर ठाम होते. मात्र भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने त्यांना आपल्या मागण्यांवर उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले. अण्णा हजारे यांच्या या निर्णयावर सोशल माध्यमांमध्ये शंका उपस्थित केल्या जात असून, शिवसेनेनंही अण्णा हजारे यांना काही सवाल केले आहेत. अण्णा यांनी चोख प्रत्युत्तर देत शिवसेनेला धमकीवजा इशारा दिला आहे.
तुमचे मंत्री कुणाच्या तरी घरी गेले हे विसरलात का?, असा सवाल अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे. भ्रष्टाचार केला, त्याला पाठीशी घातलं म्हणून आम्ही आंदोलन केलं होतं. त्यावेळी तुमचा मंत्री कुणाच्या तरी घरी गेला होता. समाज आणि देश या व्यतिरिक्त आमच्यासमोर भाजपा, शिवसेना, काँग्रेस कुणीच नाही. ज्या ज्या वेळेला आम्हाला दिसलं की हे समाजाला घातक आहे, अशं कृत्य होतं. त्यावेळी आम्ही आंदोलनं केली आहे. हे काही पहिलं आंदोलन नाही. तसेच तुमच्या मंत्र्यांनी किती भ्रष्टाचार केला आणि त्यांना तुम्ही कसं पाठिशी घातलं, याची सविस्तर माहिती माझ्याकडे आहे. भाजपची सत्ता आल्यापासून माझी जवळपास ६ आंदोलनं झाली, असं अण्णा हजारे यांनी सांगितले. आजच अग्रलेख लिहण्याचं काय कारण होतं, हे माध्यमांनी त्यांना विचारा. त्यानंतर ते काय बोलतायं ते मला सांगा, मग मी सर्व बाहेर काढतो, असा दावा देखील अण्णा हजारे यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अण्णा दोन वेळा दिल्लीत आले आणि त्यांनी जंगी आंदोलन केले. या आंदोलनाच्या मशालींवर तेल ओतण्याचे काम तेव्हा भाजप करीत होता, पण गेल्या सात वर्षांत मोदी राज्यात नोटाबंदीपासून लॉकडाऊनपर्यंत अनेक निर्णयांमुळे जनता बेजार झाली, पण अण्णांनी कूसही बदलली नाही असा आरोप होत राहिला. म्हणजे आंदोलने फक्त काँग्रेस राजवटीतच करायची काय? बाकी आता रामराज्य अवतरले आहे का?, असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला होता.
कृषी कायद्यांबाबत अण्णांची नेमकी भूमिका काय हे तूर्त तरी अस्पष्टच आहे. शेतकऱयांचा विषय राष्ट्रीय आहे. लाखो शेतकरी सिंघू बॉर्डरवर साठ दिवसांपासून सरकारशी संघर्ष करीत आहेत. सरकार आता त्यांचे आंदोलन चिरडायला निघाले आहे. गाझीपूर बॉर्डरवर सरकारने शेतकऱयांची कोंडी केली आहे. वीज, पाणी, अन्नधान्याची रसद कापली आहे. शेतकरी हे जणू आंतरराष्ट्रीय भगोडे आहेत, अमली पदार्थांचे आर्थिक गुन्हेगार आहेत असे ठरवून त्यांना ‘लुकआऊट’ नोटीस बजाविण्यात आली आहे.
अण्णा हजारे यांचे या घडामोडींवर नेमके काय मत आहे? मुळात अण्णा हजारे जे उपोषण करू इच्छित होते, त्यामागचा नेमका हेतू काय आहे? कृषी कायदे रद्द करावेत असे आंदोलक शेतकऱयांचे म्हणणे आहे. अण्णा हजारे यांचे उपोषण शेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी होते काय हे स्पष्ट झालेले नाही ते त्यांनी स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.