नवी दिल्ली – औद्योगिक व सेवा क्षेत्रांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी नावीन्यतेची गरज असते. विविध क्षेत्रात नाविन्यता वाढावी याकरिता निती आयोग नाविन्यता निर्देशांक जाहीर करीत असतो. या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या नाविन्यता निर्देशांकात कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ राज्य आघाडीवर आली आहेत.
या क्षेत्रात झारखंड, छत्तीसगड आणि बिहार मात्र खालच्या पातळीवर आहेत. पहिल्या क्रमांकावरील कर्नाटक या राज्याला 42.5 गुण मिळाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील महाराष्ट्राला 38 गुण मिळाले आहेत. शेवटच्या क्रमांकावरील बिहार राज्याला 14.5 इतके गुण मिळाले आहेत.
नाविन्य या क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे शहरातील परिस्थिती ग्रामीण भागातील परिस्थितीपेक्षा चांगली आहे. जी राज्य नावीन्य क्षेत्रात आघाडीवर आहेत त्या राज्यांचा इतर राज्यांनी सल्ला घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर या निर्देशांकामुळे विविध राज्यात या क्षेत्रात पुढे येण्यासाठी स्पर्धा वाढू शकेल असे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सांगितले.