पुणे – टेमघर धरण दुरुस्तीच्या कामाला फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी धरणातील पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी खडकवासला धरणात जमा होत आहे. टेमघर धरण दुरुस्तीचा हा शेवटचा टप्पा असल्याने हे काम पूर्ण झाल्यानंतर धरणातील गळती थांबणार असल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून करण्यात आला आहे.
टेमघर धरण बांधण्याचे काम 2001 मध्ये पूर्ण झाले. धरणाची एकूण क्षमता पावणेचार टीएमसी इतकी आहे. धरण पूर्ण झाल्यानंतर धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. धरणात पाणी असताना हे काम करणे शक्य नसल्यामुळे धरणातील पाणी पिण्यासाठी खडकवासला धरणात सोडण्यात येते. धरण रिकामे झाल्यानंतरच दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.
धरण दुरुस्तीचे काम मागील अडीच वर्षांपासून सुरू आहे. या कामांमध्ये पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ड्रिलींग व ग्राऊटींग यापद्धतीने धरणाच्या बाहेरील बाजूच्या भिंतीमध्ये 90 अंशाच्या कोनात ड्रिलच्या सहाय्याने छिद्र पाडण्यात आले. त्यानंतर या छिद्रामध्ये सिमेंट, सिलीका, फ्लॅशसोबतच दोन द्रवस्वरुपातील पदार्थ असे एकूण सहा पदार्थ्यांचे मिश्रण प्रेशरच्या सहाय्याने सोडले जाते. यामुळे गळती थांबण्यास मदत होते.
धरण दुरुस्तीचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यात धरणाची आतील बाजूस सिमेंटचे आच्छादीकरणाचे काम सुरू आहे. टेमघर धरणाची उंची 86 मीटर, तर लांबी 1075 मीटर आहे. एवढ्या भागामध्ये सिमेंट आच्छादीकरण केले जाणार आहे. आतापर्यंत 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. यंदा टेमघर धरण 100 टक्के भरले होते. पावसाळा व अन्य कारणांमुळे हे काम थांबले होते. उर्वरीत 30 टक्के दुरुस्तीच्या कामाला पुढील महिन्यापासून सुरुवात होणार आहे.