बडोदा- केदार जाधव व नौशाद शेख यांच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेत छत्तीसगडचा 8 गडी राखून पराभव केला.
या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना केलेल्या महाराष्ट्राने छत्तीसगडविरुद्ध मात्र, सरस खेळ केला. छत्तीसगडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋषभ तिवारी, शशांक चंद्रकीर व हरप्रीत सिंग यांनी आक्रमक फलंदजी करत संघाला 20 षटकांत 5 बाद 192 धावा केल्या. तळात शशांक सिंगने 8 चेंडूत 28 धावा केल्यामुळे त्यांना समाधानकारक धावसंख्या उभारता आली. महाराष्ट्राकडून मनोज इंगळेने सर्वाधिक 2 गडी बाद केले.
महाराष्ट्राने केदार व नौशादच्या फलंदाजीच्या जोरावर केवळ 2 गडी गमावून 196 धावा करत हा सामना जिंकला. सलामीवीर ऋतूराज गायकवाड व राहुल त्रिपाठी यांना अपयश आल्याने एकवेळ महाराष्ट्राची अवस्था 2 बाद 30 अशी बिकट बनली होती. मात्र, त्यानंतर केदारने नौशादच्या साथीत नाबाद 166 धावांची भागीदारी केली व संघाचा विजय साकार केला. केदारने 45 चेंडूत 5 चौकार व 5 षटकारांची बरसात करताना नाबाद 84 धावा केल्या. नौशादने 44 चेंडूत 10 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 78 धावा केल्या. छत्तीसगडकडून वीरप्रताप सिंग व विशाल कुशवाह यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – छत्तीसगड – 20 षटकांत 5 बाद 192 धावा. (ऋषभ तिवारी 44, शशांक चंद्रकीर 44, हरप्रीत सिंग 42, शशांक सिंग 28, मनोज इंगळे 2-43). महाराष्ट्र – 20 षटकांत 2 बाद 196 धावा. (केदार जाधव नाबाद 84, नौशाद शेख नाबाद 78, वीरप्रताप सिंग 1-23, विशाल कुशवाह 1-46).