नवी दिल्ली : पुणे तिथे काय उणे असा वाकप्रचार प्रचलित आहे. याच वाकप्रचाराचा प्रत्यय आणखी एकदा आला आहे. कारण भारतामधील सर्वात आनंदी शहरांच्या यादीची घोषणा करण्यात आली आहे. ‘इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट २०२०’च्या या यादीमधील देशातील सर्वाधिक आनंदी शहरांपैकी अव्वल २५ शहरांमध्ये महाराष्ट्रातील तीन शहरे आहेत. विशेष म्हणजे आनंदी राहण्याच्या पुण्याने मुंबई आणि नागपूरला मागे टाकले असल्याचे यादीत दिसत आहे.
‘इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट २०२०’च्या यादीमध्ये देशातील सर्वात आनंदी असणाऱ्या ३४ शहरांची यादी देण्यात आली आहे. प्राध्यापक राजेश पिल्लानिया यांनी ऑक्टोबर २०२० ते नोव्हेंबर २०२० दरम्यान देशभरातील वेगवेगळ्या शहरांमधील १३ हजारहून अधिक जणांचे सर्वेक्षण करुन ही यादी तयार केली आहे. राजेश हे मागील अनेक दशकांपासून व्यवस्थापन संदर्भातील संशोधनामध्ये कार्यरत असून त्यांच्या या प्रोजेक्टमुळे पहिल्यांदाच भारतातील वेगवेगळ्या शहरांमधील हॅपीनेस इंडेक्स म्हणजेच आनंदी राहण्याच्या प्रमाणासंदर्भातील माहिती समोर आली आहे.
देशातील सर्वात आनंदी शहरांच्या यादीमध्ये लुधियाना, अहमदाबाद आणि चंदिगड ही तीन शहरे अव्वल स्थानी आहेत. तर टू टीयर सीटींच्या यादीमध्ये अहमदाबाद, हैदराबाद आणि नवी दिल्ली ही शहरे सर्वाधिक आनंदी शहरे ठरली आहेत. त्याचप्रमाणे टू-टीयर सिटींच्या यादीत लुधियाना, चंदिगड आणि सुरत या तीन शहरांनी बाजी मारली आहे. वयोमान, शिक्षण, कमाई आणि एकंदरीत एखाद्या शहरात राहताना मिळणाऱ्या सुखसोयी तसेच जीवनशैली यांच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे मोठ्या शहरांमध्ये अविवाहित नागरिक हे विवाहितांपेक्षा अधिक आनंदी असल्याचेही या सर्वेक्षणात दिसून आले आहे. महाराष्ट्रामधील तीन शहरांचा या यादीमध्ये समावेश आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी असणारे पुणे शहर या यादीत १२ व्या स्थानी आहे. राज्याची उपराजधानी असणारं नागपूर शहर १७ व्या स्थानी तर राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई २१ व्या स्थानी आहे. सर्वाधिक आनंदी शहरांच्या यादीमध्ये गुजरातमधील अनेक शहरांचा समावेश आहे.