पुणे – स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याची मर्यादा निश्चित केली आहे. खुल्या संवर्गातील उमेदवारास कमाल सहा संधी, तर उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारास कमाल नऊ संधीची मर्यादा लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बुधवारी घेतला. हा निर्णय आगामी परीक्षांपासून लागू असेल, असेही आयोगाने म्हटले आहे.
आयोगामार्फत विविध शासकीय पदांसाठी सुयोग्य उमेदवारांच्या नियुक्तीसाठी परीक्षा घेतली जातात. त्यानंतर पात्र उमेदवारांची शासनाकडे नियुक्तीची शिफारस केली जाते. मात्र, शासकीय पदासाठी यापूर्वी उमेदवारांस कितीही वेळा परीक्षा देण्याची संधी होती.
वयाची निकष संपेपर्यंत उमेदवार आयोगाच्या परीक्षा देत असतात. त्यामुळे उमेदवार परीक्षेत अपयश आले तरी तयारी करीत असतात. मात्र, या परीक्षेच्या संधीमध्ये काही मर्यादा निश्चित करण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा उमेदवारांतून होत होती. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने अखेर परीक्षा देण्याविषयी मर्यादा घालून दिली.
आता आयोगाच्या शासकीय पदासाठी खुल्या संवर्गातील उमेदवारास सहा संधी उपलब्ध होतील. अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारास कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही. उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारास कमाल नऊ संधी उपलब्ध राहतील, असे आयोगाने स्पष्ट केले.
दरम्यान, उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास, ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल.
एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास, त्याची ती संधी समजली जाणार आहे. उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर मात्र अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची परीक्षेस उपस्थिती गणली जाणार आहे.