नवी दिल्ली – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांवरील चर्चेला आव्हान दिले असता दिल्ली भाजपने त्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले. माजी प्रदेशाध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांच्या निवासस्थानी, प्रदेशाध्यक्ष आदर्श कुमार गुप्ता आणि भाजपचे सर्व नेते मुख्यमंत्री केजरीवाल यांची वाट पाहत होते. परंतु, केजरीवाल काही कारणास्तव त्याठिकाणी आले नाही. यावर आजही मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या व्यस्ततेमुळे येऊ शकले नाही. परंतु, त्यांनी त्यांच्या सोयीनुसार स्थान आणि वेळ सांगावी, भाजप नेते केजरीवाल यांना कृषी कायदयाचे फायदे समजावतील, असे मनोज तिवारी यांनी म्हंटले आहे.
केंद्र सरकारने केलेले तीन कृषी विषयक कायद्यांचा लाभ आपण केजरीवालांना समजावून सांगू आणि त्यांच्या मनातील या कायद्यांविषयीच्या शंकांचे निरसन करू त्यासाठी त्यांनी आपल्या घरी यावे, असे निमंत्रण दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे खासदार मनोज तिवारी यांनी त्यांना दिले होते. केजरीवाल यांच्यासाठी चर्चेदरम्यान चहाची व्यवस्थाही केली होती. परंतु, ते आले नाही, असेही त्यांनी सांगितले.
तसेच, मागील काही दिवसांपासून महापालिकेचे तीन महापौर मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आंदोलन करत आहेत. केजरीवाल यांनी त्यांची भेटही घेतली नाही. मात्र, रविवारी रात्र सिंघू सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी ते पोहचले. यावेळी केजरीवालांनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची मोदी सरकारला विनंती केली आहे, असे तिवारी यांनी सांगितले.
दरम्यान, तिवारी यांनी म्हटले होते की, कालच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी सर्व शेतकऱ्यांना तिन्ही कायद्यांचा लाभ समजावून सांगितला आहे. मंडीची व्यवस्था कायम राहील आणि शेतकऱ्यांना एमएसपीही दिला जाईल असे अमित शहा आणि भाजप अध्यक्ष नड्डा यांनीही सांगितले आहे. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना दलालांच्या मध्यस्थी शिवाय आपला माल देशभरात कोठेही विकता येईल असेही तिवारी यांनी नमूद केले होते.