पुणे -राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांचा ऑनलाइन निकाल बुधवारी जाहीर झाला. दहावीचा निकाल एकूण 32.60 टक्के, तर बारावीचा एकूण 18.41 टक्के लागला. बारावीचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत 4.76 टक्क्यांनी घसरला आहे. याउलट दहावीचा 9.74 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
करोना पार्श्वभूमीवर जुलै-ऑगस्टमध्ये होणारी पुरवणी परीक्षा नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये घेण्यात आली. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विद्यार्थ्यांनी पुरवणी परीक्षा दिली. दहावीसाठी 44 हजार 88 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 41 हजार 397 जण परीक्षेस प्रविष्ट झाले व त्यापैकी 13 हजार 495 उत्तीर्ण झाले. एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण न होऊ शकलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या 19 हजार 812 इतकी आहे. हे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये ए.टी.के.टी सवलतीद्वारे इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
बारावीसाठी विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या शाखांतील एकूण 69 हजार 542 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 69 हजार 274 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले व त्यापैकी 12 हजार 751 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
औरंगाबाद विभागाची बाजी
इयत्ता बारावीच्या विभागनिहाय निकालात औरंगाबाद विभागाचा सर्वाधिक 27.63 टक्के निकाल लागला आहे. तर, सर्वात कमी कोकण विभागाचा 14.42 टक्के लागला आहे. बारावीचा 2018 यावर्षीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल 22.65 टक्के, तर 2019 यावर्षीचा निकाल 23.17 टक्के लागला होता. इयत्ता दहावीच्या विभागनिहाय निकालात औरंगाबाद विभागाचा सर्वाधिक 39.11 टक्के, तर सर्वात कमी नागपूर विभागाचा 29.52 टक्के लागला आहे. दहावीचा 2018 यावर्षीचा निकाल 23.66 टक्के, तर 2019 चा 22.86 टक्के लागला आहे.