ऍडलेड – भरात असलेल्या लोकेश राहुलला पहिल्या कसोटीत संधी दिली गेली नाही, याचाच सर्वाधिक फटका भारतीय संघाला बसला, अशा शब्दांत माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवाग, महंमद कैफ, संजय मांजरेकर आणि हरभजनसिंग या खेळाडूंनी आपले मत व्यक्त केले आहे.
पहिल्या कसोटीत भारतीय संघाला यजमान ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, हा पराभव केवळ एक सामना गमावणाराच नव्हे तर भारतीय संघाची प्रतिष्ठाही गमावणारा ठरला. या सामन्यात भारताला दुसऱ्या डावात केवळ 36 धावा करता आल्या. पहिल्या डावात 0 तर दुसऱ्या डावात 4 धावांची खेळी केलेल्या पृथ्वी शॉ याला संघात निवडलेच कसे गेले, असा सवालही या खेळाडूंनी विचारला आहे.
गेल्या मोसमापासून सातत्याने धावा केलेला व भरात असलेल्या लोकेश राहुलला संघाबाहेर ठेवून शॉ याला खेळवणेच भारतीय संघाला महागात पडले, असेही मत या खेळाडूंनी व्यक्त केले. आता दुसऱ्या कसोटीत तरी शॉ याला वगळून राहुलला संधी मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
चार कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेतला दुसरा सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर रंगणार आहे. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करेल. या कसोटीसाठी लोकेश राहुलला भारतीय संघात स्थान मिळायला पाहिजे. मेलबर्न कसोटीत सरस कामगिरी करण्याचे भारतीय संघासमोर आव्हान राहणार आहे.
संघात बदल करण्यासाठी संघ व्यवस्थापनासमोर खूप पर्याय आहेत. कोहली पालकत्व रजेवर भारतात परतेल, लोकेश राहुल, शुभमन गिल यांना उर्वरित तीनही कसोटीत खेळवले गेले पाहिजे. आपल्या कारकिर्दीत राहुलची ऑस्ट्रेलियाविरुद्ध कामगिरी चांगली आहे. त्यामुळे त्याला संधी मिळावी, असेही या खेळाडूंनी म्हटले आहे.