मुंबई – येत्या काही काळात अनेक नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, असा दावा करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात भविष्यात आपला पक्ष स्वबळावर सरकार स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे दहा आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आमचा कोणीही आमदार फुटणार नाही. विरोधकांना त्यांचे सरकार टिकवायचे असल्याने त्यांना अशी विधाने करावी लागतात, असा टोमणाही त्यांनी जयंत पाटील यांना मारला.
महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी एकत्रितपणे आगामी निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या पक्षांची राजकीय स्पेस कमी होत जाणार असून त्याचा लाभ भारतीय जनता पक्षालाच होणार आहे.
भारतीय जनता पक्षाला जेव्हा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळी आमचा पक्ष अधिक मजबूत झाला, असा दावा करून ते म्हणाले की आम्ही कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये स्पष्ट बहुमताने सरकारे स्थापन केली आहेत. ते म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला किंवा यूपीएला कोणतेही राजकीय भवितव्य नाही याची कल्पना आमच्या पक्षातील सर्वांना आहे. त्यामुळे आम्हाला सोडून कोणीही जाणार नाही.
देशाचे वर्तमान आणि भविष्य नरेंद्र मोदी हेच आहेत हे आमच्या पक्षातील सर्वांना ठाऊक आहे, असेही त्यांनी नमूद केले. आज फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिक येथील शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.