सातारा (प्रतिनिधी) – छत्रपती शाहू महाराजांनी साताऱ्यात स्वराज्याची राजधानी स्थापन केली. त्यांचा राज्याभिषेकदिन “सातारा स्वाभिमानदिन’ म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शाहूंच्या राज्याभिषकानिमित्त दरवर्षी दि. 12 जानेवारीला सातारा पालिकेची विशेष सभा अजिंक्यतारा किल्ल्याच्या राजसदरेवर घेण्याची घोषणा खा. उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
यावेळी नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजित बापट, शिवकालाचे अभ्यासक डॉ. संदीप महिंद गुरुजी, शिवराज्याभिषेकदिन उत्सव समितीचे संस्थापक सुदाम गायकवाड, सुनील काटकर, कन्हैयालाल राजपुरोहित, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, मनोज पाटील, अमोल सणस, विक्रमसिंह पाटील, प्रशांत पवार उपस्थित होते. किल्ल्यावर अशी सभा घेणारी सातारा ही महाराष्ट्रातील पहिली पालिका ठरेल.
सातारच्या शिवराज्याभिषेकदिन उत्सव समितीच्यावतीने 12 जानेवारी हा दिवस गेल्या आठ वर्षांपासून “सातारा स्वाभिमानदिन’ म्हणून साजरा केला जातो. सातारा शहराची हद्दवाढ झाल्याने अजिंक्यतारा किल्ला शहराच्या हद्दीत आला आहे.
या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे यांनी ही घोषणा केली आहे. हा दिवस सातारा शिवराज्याभिषेकदिन उत्सव समिती व पालिका यांच्यावतीने साजरा केला जाणार आहे. उदयनराजे म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टीने सातारा ही स्वराज्याची राजधानी केली होती.
हिंदुस्थानच्या इतिहासात सर्वांत मोठा राज्य विस्तार याच सातारा राजधानीतून झाला. छत्रपती शाहू महाराज म्हणजे छत्रपती शिवरायांची सावली, असे वर्णन इतिहासकारांनी केले आहे. अखंड हिंदुस्थान बांधण्याचे काम शाहू महाराजांनी केले, म्हणून त्यांचा राज्याभिषेकदिन हा सातारा स्वाभिमानदिन म्हणून साजरा होत आहे. या उत्सवाची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.