राजगुरूनगर (पुणे) – आजारपण आणि वार्धक्यावर मात करीत राज्यातील जनतेला अडचणीच्या काळात धीर आणि विश्वास तसेच सर्वच घटकातील नागरिकांना न्याय देणारा नेता म्हणजे शरद पवार आहेत, असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी केले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने तालुक्यातील तीन ग्रामीण रुग्णालयांना व्हेंटिलेटर देण्यात आली. त्याचे लोकार्पण आमदार तथा राज्य बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. 12) बाजार समितीच्या आवारात झाले, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे होत्या. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, उपसभापती धारू गवारी, सचिव बाळासाहेब धंद्रे, पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे, सदस्य अरूण चौधरी, राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला उपाध्यक्ष कांचन ढमाले, कैलास सांडभोर, कैलास लिंभोरे, बाळशेठ ठाकूर, चंद्रकांत इंगवले, सुरेखा टोपे, विठ्ठल वनघरे, अरूण चांभारे, नवनाथ होले, विलास कातोरे, राजाराम लोखंडे, ऍड. सुखदेव पानसरे, ऍड. मनीषा टाकळकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार मोहिते म्हणाले की, शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या आवश्यक त्या गरजा पूर्ण करणारा नेता म्हणजे शरद पवार आहेत. महिलांसाठी 33 टक्के आणि नंतर 50 टक्के आरक्षण देण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका निभावली आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी राजगुरूनगर येथे कांदा लसूण संशोधन केंद्र सुरू केले. खेळाडूंसाठी आयपीएलची निर्मिती केली. सर्वच घटकातील नागरिकांना त्यांचे अधिकार, न्याय आणि सेवा-सुविधा निर्माण करून देणारे ते नेतृत्व आहे. या वयातही ते तरुणासारखे काम करीत सर्वसामान्य जनतेची सेवा करीत आहेत. शरद पवार यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना आपण करू. तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला वेळेत, कमी खर्चात आणि योग्य उपचार मिळावेत यासाठी बाजार समितीच्यामाध्यमातून तीनही ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर देण्यात आली आहेत. त्याचा योग्य वापर करावा. त्यासाठी आश्यक डॉक्टर आणि साधन सामुग्री उपलब्ध केली जाईल. सर्वसामान्य नागरिकांवर उपचार करताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
विनायक घुमटकर म्हणाले, सामाजिक विचार आणि दृष्टिकोन हा केंद्रबिंदू ठेवून शरद पवार यांनी सामाजिक कार्य केले. बहुजन समाजाला न्याय दिला. राज्याचे प्रतिनिधित्व करताना समाजोपयोगी निर्णय घेतले शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचे राजकारण केले, त्यामुळे ते उच्च पदावर पोहोचले, असे त्यांनी नमूद केले.
- “कार्यकर्त्यांनी रक्तदान करावे’
राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्तदान करण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी नजीकच्या रक्तदान शिबिरात रक्तदान करावे. “शरद’ सप्ताहात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे घेतली जाणार असून त्यात कार्यकर्त्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन मदार मोहिते यांनी कार्यकर्त्याना केले. - बाजार समितीकडून व्हेंटिलेटर दिले तर गोरगरिबांना सेवा सुविधा मिळेल हा उद्देश ठेवून तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेसाठी बाजार समितीच्या वतीने 6 व्हेंटिलेटर देण्यात आली आहेत. अशा प्रकारचा प्रयोग करणारी खेड बाजार समिती राज्यातील पहिली बाजार समिती ठरली आहे. शेतकरी आणि तालुक्यातील नागरिकांसाठी दिलासादायक काम बाजार समितीकडून केले जाते.
– विनायक घुमटकर, सभापती, बाजार समिती, खेड