सिडनी – ऑस्ट्रेलियाच्या अ संघाविरुद्धच्या तीन दिवसांच्या सराव सामन्यात भारताच्या अ संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने ज्या आक्रमक पद्धतीने नेतृत्व केले त्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू व समालोचक इयान चॅपेल यांनी कौतुक केले आहे.
नियमित कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार असल्याने नेतृत्व रहाणेकडेच येण्याची शक्यता आहे, त्यामुळे चॅपेल यांनीही समाधान व्यक्त केले असून भारतीय संघाला रहाणेसारख्याच आक्रमक कर्णधाराची गरज आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.
भारतीय संघाचे सराव सामन्यात रहाणेने अत्यंत आक्रमक नेतृत्व केले. त्याने डाव घोषित करताना गोलंदाजांना जास्तीत जास्त वेळ मिळेल व जास्त षटके टाकता येतील हे पाहिले, त्यामुळे आपण खूपच प्रभावीत जाल्याचेही त्यांनी सांगितले.
एकदिवसीय तसेच टी-20 सामन्यांची मालिका संपल्यावर आता येत्या 17 डिसेंबरपासून कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. पहिल्या कसोटीनंतर कोहली पालकत्व रजा घेत मायदेशी परतेल, अशा वेळी संघात अनुभवी व आक्रमक कर्णधाराची गरज आहे व ही उणीव रहाणे निश्चितच भरून काढेल, असा विश्वासही चॅपेल यांनी व्यक्त केला.
केवळ सराव सामन्ययातच नव्हे तर मी रहाणेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाला येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना पाहिले आहे. तो आक्रमक कर्णधार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात चांगली फलंदाजी करत होता. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरही भरात होता. त्यावेळी तो कदाचित फिरकी गोलंदाजासमोर यशस्वी होणार नाही, त्यातच डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवची गोलंदाजीचे खेळणे त्याला कठीण जाईल असा विचार रहाणेने केला व कुलदीपला गोलंदजी दिली. त्यानेच वॉर्नरला बाद केले व रहाणेचा विश्वास सार्थ ठरवला. यातच रहाणेचा फलंदाजाबद्दलचा अभ्यास दिसून आला. असाच कर्णधार कोहलीच्या जागी संघाला मिळाला तर याही मालिकेत भारतीय संघ यजमान ऑस्ट्रेलियावर दबाव राखू शकेल, असेही ते म्हणाले.
कर्णधार म्हणून तुमच्याकडे दोन पर्याय असतात. एक म्हणजे आक्रमक स्वभावाचा आणि एक म्हणजे शांत राहून रणनिती आखून निर्णय घेणारा. माझी पहिली पसंती ही नेहमी आक्रमक स्वभावाच्या कर्णधाराला राहिली आहे, रहाणे एक आक्रमक कर्णधार आहे. त्यामुळे कोहलीच्या जागी त्याच्याकडेच नेतृत्व सोपवावे असे मसा वाटते, असेही चॅपेल यांनी सांगितले.