अकलूज -पानीव (ता. माळशिरस) येथील एका मध्यमवयीन व्यक्तूचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी गिरझणी (ता. माळशिरस) येथील तलावात टाकून देण्यात आल्याप्रकरणी अकलूज पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
याबाबत सविस्तर माहीती अशी की, बुधवारी (दि. 18) सायंकाळी 7.30 च्या सुमारास संभाजी महादेव बाबर (वय 40, रा. पानीव, ता. माळशिरस) हे सायंकाळी साडेसातच्या सुमारास गिरझणी येथील तळ्यावर मासे पकडण्यासाठी जाळे टाकण्यासाठी गले होते, ते घरी आलेच नाही.
त्यामुळे त्यांचे भाऊ नाथाजी महादेव बाबर यांनी नातेवाइकांसह त्यांचा गिरझणी व अकलूज परिसरात शोध घेतला; परंतु ते सापडले नाहीत. त्यानंतर संभाजी हे हरवले असल्याची तक्रार अकलूज पोलिसांत देण्यात आली होती.
शनिवारी (दि. 21) नाथाजी बाबर व विठ्ठल बाबर हे शोध घेण्यासाठी तळ्यावर गेले असता संभाजी यांचे प्रेत फुगून पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले, याची माहीती अकलूज पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
याबाबत नाथाजी महादेव बाबर यांनी तक्रार दिली. यानंतर तपास केला असता भालचंद्र ज्योतीराम कोठावळे (वय 37) आणि त्याचेबरोबर एक अल्पवयीन (दोघे रा. पानीव, ता. माळशिरस) यांना अटक केली आहे. बाबर हा भालचंद्र याच्या पत्नीची छेड काढत असल्याच्या रागातून हा गुन्हा घडला असल्याचे तपासांती समोर आले आहे.