नवी दिल्ली – देशातील कृषी रसायन उद्योगाचे संवर्धन करण्यासाठी कीटकनाशकांच्या आयातीवर 20 ते 30 टक्के शुल्क लावण्याची मागणी कीटक नाशक उत्पादकांच्या संघटनेने केली आहे. सध्या अशा कीटकनाशकावर 10 टक्के आयात शुल्क आहे. त्यामध्ये तात्काळ वाढ करण्याची गरज आहे. 1991 आगोदर कीटकनाशकावर 40 टक्के आयात शुल्क होते असे या संघटनेचे अध्यक्ष प्रदीप दवे यांनी सांगितले.
2007 मध्ये या आयात शुल्कात घट करण्यात आली. त्यामुळे देशांतर्गत तयार करण्यात आलेल्या कीटकनाशकापेक्षा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी तयार केलेली कीटकनाशके भारतीय ग्राहकांना स्वस्तात पडत आहेत.
भारतात कीटकनाशके तयार करणाऱ्या 200 छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांना आयातीला मोकळे रान दिल्यामुळे परिणाम होत आहे. भारतातील कीटकनाशकांची बाजारपेठ 43 हजार कोटी रुपयाचे असल्याचे सांगितले जाते. भारत 23 हजार कोटी रुपयाच्या किटकनाशकांची निर्यात करतो.