तज्ज्ञांचे मत; शहर, उपनगरांत कचरा जाळण्याचे प्रमाण वाढले
पुणे – शहरातील कचरा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर समस्या बनली आहे. चुकीच्या पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावल्याने मानवी आरोग्यावर तर त्याचे भयानक परिणाम होत असतात; परंतु पक्ष्यांनाही यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषत: कचरा जाळल्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या भ्रमणमार्गात अडथळा निर्माण होत असल्याचे निरीक्षण पक्षी अभ्यासकांनी नोंदविले आहे.
ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत अनेक स्थलांतरित पक्षी शहर तसेच उपनगरांतील पाणथळ परिसरात वास्तव्यास येतात. शहरातील पाषाण तलाव, नदीपात्र, विविध ओढे-नाल्यांचा परिसर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी दिसून येतात. मात्र, यापैकी बहुतांश परिसर हे अलीकडील काळात कचराकुंडी बनले आहेत.
शहरातील अनेक पाणथळांचा परिसर हा अतिक्रमण आणि कचरा समस्येने ग्रस्त आहेत. चुकीच्या पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट ही या भागातील पक्ष्यांसाठी हानिकारक ठरत आहे. अनेक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जातो. तर, काही ठिकाणी तो सर्रासपणे जाळला जातो.
यामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा धूर दुर्गंधी आणि हवेच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरतो.
याबाबत महापालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे म्हणाले की, पक्ष्यांच्या स्थलांतर काळात कचरा जाळण्याचे दुष्परिणाम ही नक्कीच गंभीर समस्या आहे. याबाबत महपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांसोबत संपर्क साधून या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी आगामी काळात आवश्यक प्रयत्न केले जातील.
येरवडा परिसरात प्रमाण अधिक…
येरवडा परिसरातील “डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य’ परिसरात असे प्रकार सातत्याने पाहायला मिळतात. तब्बल 140 प्रजातींच्या पक्ष्यांचे निवासस्थान असलेला हा परिसर नेहमीच धुराने व्यापलेला असतो. साहजिकपणे पक्ष्यांच्या आरोग्यावरही त्याचे गंभीर परिणाम पाहायला मिळतात. तसेच, अनेकदा स्थलांतरित पक्षी त्यांच्या नियोजित स्थळांवर पोहोचू शकत नसल्याचे निरीक्षणही पक्षी अभ्यासकांनी नोंदविले आहे.