4 हजार 500 पदांवरील भरती रखडली : प्रस्ताव मंजुरीची प्रतीक्षाच
काहीना काही कारणांनी प्रक्रियेत विघ्न
– डॉ. राजू गुरव
पुणे – पवित्र पोर्टलद्वारे शाळांमध्ये 4 हजार 500 शिक्षकांची भरती पूर्ण करण्याचा टप्पा राज्य शासनाच्या वित्त विभागाने ग्रीन सिग्नल न दिल्यामुळे रखडला आहे. त्यातच पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आता हा तिढा नवीन वर्षातच सुटण्याची शक्यता आहे.
पारदर्शक शिक्षक भरतीसाठी “पवित्र पोर्टल’ ही प्रणाली विकसित करण्यात आली. याद्वारे 12 हजार पदांसाठी प्रक्रिया सुरु केली. मात्र, काहींना काही अडचणींमुळे त्यास विलंब होत गेला. अडथळ्यांचा सामना करत पात्र, गरजू व गुणवत्ताधारक नियमात बसणाऱ्या उमेदवारांना शिक्षकाची नोकरी मिळावी यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची धडपड सुरुच आहे. त्यासाठी शासनाकडे सतत ते पाठपुरावाही करत असतात.
आतापर्यंत मुलाखतीशिवायची 6 हजार भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून हे शिक्षक शाळांमध्ये रुजूही झाले. मात्र, विविध कारणांमुळे 1 हजार 500 जागा रिक्त आहेत. याबरोबर 950 खासगी शाळांमधील 3 हजार शिक्षकांच्या मुलाखती घेऊन पदे भरण्याचे नियोजन केले होते. मात्र, ते कोलमडले आहे.
करोनामुळे राज्याचे आर्थिक चक्र बिघडले आहे. काटकसरीच्या धोरणाचा अवलंब करण्याच्या दृष्टीने शासनाने नवीन पदभरतीला बंदी घालण्याचा निर्णय मेमध्ये घेतला. यामुळे शिक्षक भरती थांबवावी लागली. अपूर्ण राहिलेली प्रक्रिया पूर्ण करण्यास शिक्षण विभागाने विशेष परवानगीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवून पाच महिने झाले.
मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यातच आता पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आचारसंहिताही लागू झाली आहे. महिनाभर ही आचारसंहिता कायम असणार आहे. त्यामुळे या कालावधीत शिक्षक भरतीचा प्रस्ताव मंजूर होऊ शकत नाही. त्यामुळे 2021 वर्षामध्येच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.