अनंतपूरम – आंध्र प्रदेशमधून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्नाहून घरी परत जात असताना वाहनाचा भीषण अपघात होऊन त्यामध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात आलेली लॉरीने कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. मृत्यांमध्ये लहान मुलांचा व महिलांचा समोवश आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात आंध्र प्रदेशातील अनंतपुरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावरील बुडागवी गावाजवळ झाला आहे
या अपघाताबाबत सविस्तर वृत्त असे की, कर्नाटकातील बेल्लारी येथे एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी उरवाकोंडा येथील एक कुटुंब आपल्या इनोव्हा कारने गेले होते. लग्नाहून परतत असताना अनंतपुरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावरील कोटलापल्ली भागात समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या लॉरीने त्यांच्या कारला भीषण टक्कर दिली. अपघात इतका भीषण होता की यात कारमधील 8 जण जागीच ठार झाले तर एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. मात्र उपचारादरम्यान आता मृत्यू झाला आहे. संबंधित सर्वजण उरवाकोंडा येथील रहिवासी होते.
या घटनेची माहिती मिळताच उरवाकोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तसेच अपघातातील मृतांची अद्याप ओळख पटली नसून त्यांची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत आहेत. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.