जुन्नर, खेड, शिरूर तालुका आघाडीवर
चौदाव्या हफ्त्यासाठी ई केवायसी रखडली
पीएम किसान योजनेत अनेक समस्या
शेरखान शेख
शिक्रापूर – जिल्ह्यातील पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा चौदावा हप्ता लवकरच येणार आहे. त्यापूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांनी ई केवायसी करणे गरजेचे आहे. पुणे जिल्ह्यातील तब्बल 84 हजार 425 शेतकरी पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. जुन्नर, खेड, शिरूर, बारामती, दौंड या तालुक्यांत केवायसीची प्रलंबित प्रकरणे मोठ्या संख्येने आहेत.
शिरुर तालुक्यातील तब्बल 8 हजार 134 लाभार्थी शेतकऱ्यांचे ई केवायसी प्रलंबित आहे. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नाही. त्यांनी तातडीने ई केवायसी करुन घेण्याचे आवाहन शिरुर तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरु केली आहे. पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत शेतकऱ्यांना चार महिन्यांच्या अंतराने दोन हजार रुपयांच्या स्वरुपात प्राप्त होत असते.
शेतकऱ्यांनी ई केवायसी न केल्यास त्यांना लाभ मिळणार नाही. ज्यांचे योजनेत नाव आहे. मात्र, बॅंकेत आधार कार्ड लिंक नाही. त्यांना सुद्धा योजनेपासून वंचित रहावे लागणार आहे. असे आवाहन शिरुर तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी केले आहे.
पीएम किसान सन्मान निधी
मोठ्या लोकसंख्येच्या गावात…
शिक्रापूर 157, सणसवाडी 106, तळेगाव ढमढेरे 249, केंदूर 309, पाबळ 272, कोरेगाव भीमा 35, टाकळी हाजी 229, विठ्ठलवाडी 71, टाकळी भीमा 142, रांजणगाव गणपती 179, धानोरे 65, जातेगाव बुद्रुक 41, करंदी 171, निमोणे 231, जातेगाव खुर्द 41, शिंदोडी 75, न्हावरा 64, उरळगाव 127, भांबर्डे 66, वडगाव रासाई 153, मांडवगण फराटा 203, वढू बुद्रुक 90, वडनेर खुर्द 36, वाघाळे 77, वाजेवाडी 37, वरुडे 38, आंबळे 60, आलेगाव पागा 120 याप्रमाणे शिरूर तालुक्यातील काही गावांत लाभार्थी योजनेपासून प्रलंबित आहेत.
दृष्टिपथातील तालुकानिहाय संख्या
पुणे जिल्ह्यातील केवायसी पेंडिंग तालुकानिहाय शेतकरी- भोर 3524, वेल्हा 1667, मावळ 3436, मुळशी 2974, हवेली 2998, खेड 12229, आंबेगाव 6057, जुन्नर 13908, शिरूर 8389, बारामती 8134, इंदापूर 6402, दौंड 7873 व पुरंदर 6534 असे पुणे जिल्ह्यातील तब्बल 84 हजार 425 शेतकरी किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात. केंद्र सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना किचकट प्रक्रियेत अडकली आहे.
प्रलंबित लाभार्थ्यांचे कारणे
शिरूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक नाहीत. काही शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे आधारमध्ये मॅच होत नाहीत. एकाच मोबाइल नंबरवरून दोन दोन शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ओटीपी येण्यास अडचण निर्माण होत आहेत. त्यामुळे हे शेतकरी यामध्ये प्रलंबित राहिले आहेत. ही कारणे योजनेला बाधा ठरत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
अद्यापपर्यंत शिरुर तालुक्यातील शेतकरी लाभार्थ्यांनी 13 हप्त्यांचा लाभ घेतला असताना, सध्या येणाऱ्या चौदाव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी लाभार्थ्यांनी ई केवायसी करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी तातडीने ई केवायसी पूर्ण करुन घ्यावे.
– सिद्धेश ढवळे, तालुका कृषी अधिकारी, शिरुर.