पुणे – पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर कामगारांसाठी अटल कामगार आवास योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, या योजनेसाठी जिल्ह्यातून अद्याप एकही अर्ज मंजूर झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अटल कामगार योजनेपुढे मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.
यासंदर्भात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून कामगार आयुक्तांकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यास कामगार विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे योजना असूनही त्याचा लाभ घेता येत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. केंद्र आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजना अंतर्गत सर्व घटकांसाठी असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेबरोबरच अनुसूचित जाती घटकासाठी रमाई आणि शबरी आवास योजना तसेच जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणारी यशवंत घरकुल आणि दिव्यांग घरकुल योजनेमध्ये आतापर्यंत 24,939 घरे बांधून पूर्ण झाली आहेत.
अद्यापही नऊ हजार 240 घरकुलांचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून देण्यात आली. दरम्यान, अटल कामगार आवास योजनेमध्ये कामगारांसाठी घरकुल मंजूर केले जाते. त्यासाठी एक लाख वीस हजार रुपयांचा निधी आणि सोबत शौचालयासाठी स्वतंत्र निधी दिला जातो. या संदर्भात कामगार आयुक्तालाकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु कामगारांची नोंदणी ही एक वर्षासाठीच्या मुदतीत असल्याने तसेच काही तांत्रिक अडचणीमुळे अद्याप एकही घर मंजूर होऊ शकले नाही, अथवा घरकुलांचे प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे आलेले नाहीत.