कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या पाणीसाठ्यात झाली वाढ
नगर – जिल्ह्याच्या पाणी परिस्थितीत समाधानकारक वाढ होताना दिसत आहे. आजमितीला जिल्ह्यातील कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांमध्ये देखील चांगली वाढ होतांना दिसत आहे. जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्प यापूर्वीच भरले असून नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस लघुपाठबंधारे तलावातून आतापर्यंत म्हणजेच 11 तारखेपर्यंत या सर्व लघुप्रकल्पातून 88.46 दलघमी इतका साठा झाला आहे. यासर्व तलावांमधून 105.953 दलघमी इतका पाणीसाठा होणे अपेक्षित आहे.
कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातूनही 58.14 दलघमी इतका साठा होणे अपेक्षीत आहे.त्यापैकी 1 ऑक्टोबर नंतर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या फळ्या लावून पाणी अडविण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत 44.08 दलघमी इतका साठा झाला आहे. म्हणजेच आतापर्यंत जवळपास 80 टक्क्यांपर्यंत पाणी साठा झाला आहे. म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत आतापर्यंत पाणीसाठा दुपटीने वाढला आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला लघु प्रकल्पांपैकी सुमारे निम्म्याच्या वर प्रकल्पांमध्ये अगदी कमी पाणीसाठा होता मात्र ऑक्टोबरच्या मध्यानंतर त्यात बऱ्या पैकी पाणी साठले आहे.आणि आता नोव्हेंबर मध्यापर्यंत त्यात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते. एकूणच जिल्ह्याची पाणी परीस्थिती सध्या समाधानकारक आहे.
51 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी
जिल्ह्यातील 51 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापैकी सर्व बंधाऱ्यातून 58.14 दलघमी पाणी साठणे अपेक्षित आहे. सध्या या सर्व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये 44.08 दलघमी इतका म्हणजेच 80 टक्क्यांएवढे पाणी साठले आहे. म्हणजेच या पाणीसाठ्यामुळे एखादे आवर्तन पुढे ढकलता येवू शकेल.