मुंबई – भिवंडी इमारत दुर्घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी दुपारी साधारण दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर एनडीआरएफसह टीडीआरएफच्या जवानांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले. सोमवारी ढिगाऱ्याखालून आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. यानंतर हे बचावकार्य 45 तासांनंतर थांबवण्यात आले.
अशोक मिश्रा (वय 32) आणि दिनेश तिवारी (वय 34) अशी या दोन मृत नागरिकांची नावे आहेत. या इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, बचाव पथकाने तब्बल 45 तास अथक परिश्रम करून ही शोध मोहीम सुरूच ठेवून आठ मृतदेह तर दहा नागरिकांची सुटका केली. यामुळे नागरिकांनी एनडीआरएफ, टीडीआरएफ अग्निशमन दल व बचाव पथकातील इतर कर्मचाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन आभार व्यक्त केले.
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री दुर्घटना स्थळाला भेट दिली होती. तसेच त्यांनी भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयालाही भेट दिली होती. यावेळी त्यांनी या इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्या मजुरांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली आणि त्यांना धीर दिला. त्यानंतर त्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री साहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.